‘त्या’ तरुणाची सात दिवस मृत्युशी झुंज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:30 IST2021-02-09T04:30:30+5:302021-02-09T04:30:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : ऊन व थंडी झेलत जखमी अवस्थेत तो अन्नपाण्याशिवाय सात दिवस पाण्यात निपचित पडला होता. ...

‘त्या’ तरुणाची सात दिवस मृत्युशी झुंज
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : ऊन व थंडी झेलत जखमी अवस्थेत तो अन्नपाण्याशिवाय सात दिवस पाण्यात निपचित पडला होता. त्याला हालता येत नव्हते. जखमांवर किडे, मुंग्या फिरत होत्या. ज्याठिकाणी तो पडला होता, तेथून कालव्याचे पाणी जात होते. मात्र, पाण्याचा प्रवाह कमी असल्याने त्याच्या अंगाखालून पाणी चालले होते. प्रवाह जास्त असता तर त्याला आपला जीव गमवावा लागला असता, पण त्याच्या आयुष्याची दोरीच बळकट होती.
अमेणी पैकी खोंगेवाडी (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) येथील रुपेश विष्णू कदम (वय २६) हा ३० जानेवारी रोजी कोकरूड (ता. शिराळा) येथे मामांच्या घरी आला होता. त्याच रात्री तो गावी परतला. मात्र, घरी पोहोचला नाही. दुसऱ्या दिवशी त्याचा मोबाईलही बंद असल्याने नातेवाईकांनी मामाकडे चौकशी केली. त्यानंतर रुपेशचा सर्वत्र शोध सुरू झाला. तो सापडला नसल्याने त्याच्या वडिलांनी रुपेश बेपत्ता असल्याची फिर्याद १ फेब्रुवारी रोजी कोकरूड पोलीस ठाण्यात दिली.
शनिवारी (दि. ६) सकाळी तुरुकवाडी येथील सुभाष पाटील व विलास पाटील हे शेतीला पाणी पाजण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना शाहीरवाडी येथील सनंदरा शेताजवळ कोकरूड ते तुरुकवाडी रस्त्यालगत दहा ते पंधरा फूट ओघळात अर्धवट बेशुद्ध अवस्थेत विव्हळत पडलेला तरुण आढळला. शेजारी दुचाकीही होती.
दरम्यान, तरुण बेपत्ता असल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे सर्वत्र फिरत होती. त्यावरून तो रुपेश असल्याची खात्री त्यांना पटली. त्यानंतर डॉ. नामदेव पाटील, युवराज पाटील, एकनाथ पाटील व ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेतून त्याला भेडसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे नेले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. रुग्णालयात जाऊन त्याच्या नातेवाईकांनी तो रुपेश असल्याची खात्री करुन घेतली. अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार एस. एल. मोरे हे करत आहेत.
फोटो-०६रुपेश कदम