येडेमच्छिंद्रच्या जगताप बंधूंचे १५ गुंठ्यांत ४४ टनाचे ऊस उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:27 IST2021-02-11T04:27:52+5:302021-02-11T04:27:52+5:30
शिरटे : साधारणत: पंधरा गुंठ्यात १२ ते १४ टन उसाचे उत्पन्न निघणाऱ्या त्याच क्षेत्रात योग्य नियोजन, संतुलित खत व्यवस्थापन ...

येडेमच्छिंद्रच्या जगताप बंधूंचे १५ गुंठ्यांत ४४ टनाचे ऊस उत्पादन
शिरटे : साधारणत: पंधरा गुंठ्यात १२ ते १४ टन उसाचे उत्पन्न निघणाऱ्या त्याच क्षेत्रात योग्य नियोजन, संतुलित खत व्यवस्थापन व वेळेला महत्त्व देत येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील जगताप बंधूंनी नुकतेच ४४ टनाचे उत्पन्न घेतले आहे. त्यांच्या उसाला ५२ ते ५४ कांड्या होत्या.
दत्तात्रय जगताप व हर्षद जगताप या बंधूंनी आपापले व्यवसाय सांभाळीत यावर्षी शेतीकडे लक्ष दिले. मार्चमध्ये शेताची पहिली नांगरट केली. त्यानंतर शेणखत घालून दुसरी नांगरट केली. मेअखेर शेताची मशागत करून जूनच्या पहिल्या आठवड्यात को. ८६,०३२ या ऊस जातीची लावण केली. ही लावण औषधाच्या द्रावणात बुडवून केली.
गावातीलच रोहित पाटील व राजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शन व सल्ल्यानुसार ऊसपिकाचे व्यवस्थापन केले. वेळच्यावेळी लागवड, पाणी व औषध फवारणी केली. पिकाची वाढही जोमदार झाल्याने ऊसतोडणीवेळी उसाला ५२ ते ५४ कांड्या होत्या. या क्षेत्रात पहिल्यांदाच एवढा ऊस निघाल्याने जगताप बंधू आनंदित झाले आहेत.
कोट
आम्हाला जमीन क्षेत्र कमी असल्याने मी व माझा लहान बंधू दोघेही व्यवसाय करतो. यावर्षी दोघांनीही शेतीत लक्ष घालून कष्ट केले. प्रामाणिक कष्टाचे चीज झाल्याने समाधान वाटते.
- दत्तात्रय जगताप, येडेमच्छिंद्र
फोटो- १००२२०२१-आयएसएलएम-येडेमच्छिंद्र न्यूज
येडेमच्छिंद्र (ता.वाळवा) दत्तात्रय व हर्षद जगताप यांचे क्षेत्रातील ५४ कांड्या असणारा ऊस.