यंदा केवळ तीनच ग्रामपंचायती तंटामुक्त

By Admin | Updated: May 26, 2015 00:54 IST2015-05-25T23:24:51+5:302015-05-26T00:54:08+5:30

रत्नागिरी जिल्हा : तीनशे ठिकाणचे तंटे कायमच

This year, only three Gram Panchayats are free from conflict | यंदा केवळ तीनच ग्रामपंचायती तंटामुक्त

यंदा केवळ तीनच ग्रामपंचायती तंटामुक्त

रत्नागिरी : जिल्ह्यातील ८४४ ग्रामपंचायतींपैकी ५४१ ग्रामपंचायती तंटामुक्त झाल्या आहेत. यावर्षी त्यामध्ये आणखी तीन ग्रामपंचायतींची भर पडली आहे. निगडी (मंडणगड), भराडी (मंडणगड), पालशेत (गुहागर) या ग्रामपंचायती तंटामुक्त झाल्या आहेत.जिल्ह्यातील ८४४ पैकी ३०३ ग्रामपंचायती तंटामुक्त व्हायच्या शिल्लक आहेत. केवळ तीन ग्रामपंचायती तंटामुक्त झाल्याने अद्याप ३०० ग्रामपंचायती तंटामुक्त होणे बाकी आहे. मंडणगड, गुहागर तालुकेवगळता अन्य सात तालुक्यातील ग्रामपंचायती तंटामुक्त झालेल्या नाहीत. जिल्ह्याच्या ९ तालुक्याच्या मूल्यमापन समिती सदस्यांच्या बैठकीत यावर्षी तंटामुक्त होण्याचे प्रमाण नगण्य असल्याकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले. इच्छाशक्तीची कमतरता असल्याचे मत बैठकीत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील, पोलीस निरीक्षक व तहसीलदार उपस्थित होते. काही ग्रामपंचायती तंटामुक्त होण्याच्या गुणांकनापर्यंत पात्र ठरु शकतात. त्यासाठी ५ जूनपर्यंतच्या उर्वरित कालावधीत पाठपुरावा करण्याची सूचना देण्यात आली आहे.जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी मार्गदर्शन करीत असताना गाव तंटामुक्त होण्यासाठी इतर सर्व बाबींची पूर्तता होत असताना केवळ दिवाणी तंट्यांमुळे गाव अपात्र ठरत असेल, तर अशा गावांचा स्वतंत्र तक्ता तयार करावा. या गावांचा स्वतंत्र अहवाल शासनाकडे पाठवून त्याबाबत काही वेगळा विचार करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्याची सूचना केली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी दिवाणी खटले तंटामुक्त होण्यामध्ये अडथळे ठरत असल्याचे मत नोंदवले. प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कामे उल्लेखनीय असून, दिवाणी खटले तंटामुक्त समितीच्या गुणांमध्ये गावाचे गुण कमी करत असल्याचे सांगितले.अनेक गावांमध्ये तंटामुक्त योजनांचा अहवाल तयार करण्यात ग्रामसेवक, पोलीसपाटील, तलाठी अनिच्छा दर्शवतात. त्यामुळे गावे तंटामुक्त होण्यास विलंब होतो. याबाबत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी संबंधित अधिकारी, कर्मचारीवर्गाकडून काम करुन घेण्याची सूचना बैठकीत दिली. (प्रतिनिधी)

Web Title: This year, only three Gram Panchayats are free from conflict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.