२८ टक्के बालकांमध्ये जंतदोष; तरीही जंतनाशक गोळ्यांचे वाटपच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:29 IST2021-09-12T04:29:53+5:302021-09-12T04:29:53+5:30
कृमीदोषामुळे ५ ते १९ वयोगातील मुला-मुलींना रक्ताक्षय, कुपोषणासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. दीर्घकालीन कृमीदोषामुळे मुलांमध्ये कमजोरी तर येतेच ...

२८ टक्के बालकांमध्ये जंतदोष; तरीही जंतनाशक गोळ्यांचे वाटपच नाही
कृमीदोषामुळे ५ ते १९ वयोगातील मुला-मुलींना रक्ताक्षय, कुपोषणासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. दीर्घकालीन कृमीदोषामुळे मुलांमध्ये कमजोरी तर येतेच शिवाय, बालकांची बौद्धिक व शारीरिक वाढही खुंटते. त्यामुळे कृमीदोषाकडे वेळीच लक्ष न दिल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. कृमीदोष आढळणारी मुले ही कायम अशक्त आणि थकलेली असतात व ते अभ्यासाकडे लक्ष देऊ शकत नाहीत. म्हणूनच १ ते १९ वयोगटातील मुलाला जंतनाशक गोळी वर्षातून किमान एक दिलीच पाहिजे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
चौकट
वयाच्या १९ वर्षांपर्यंत द्याव्या लागतात गोळ्या
१ ते १९ वर्षे वयाच्या मुलांना जंताचा त्रास जास्त होऊ शकतो. आतड्यांमधल्या जंतांचे पूर्णपणे निर्मूलन करण्यासाठीच वर्षाला जंतनाशक गोळ्यांचे मुलाना वाटप केले जाते.एकदा का जंतांनी शरीरात प्रवेश केला की ते आतड्यात प्रवेश करतात. ते आतड्यातले थर नष्ट करतात. त्यामुळे शरीरात अन्नघटकांचे शोषण नीट होत नाही. म्हणूनच १९ वर्षांपर्यंत जंतनाशक गोळ्या घेण्याची गरज आहे, असे डॉक्टरांचे मत आहे.
कोट
गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे शाळा भरल्या नाहीत. यामुळे जंतनाशक गोळ्यांचे मुलांना वाटप झाले नाही. पण, यावर्षी सध्या शाळा सुरू झाल्यामुळे दि. २१ ते २८ सप्टेंबर कालावधीत जंतनाशक गोळ्या वाटप करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने आम्ही पूर्ण नियोजन केले आहे.
-डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली.
चौकट
काय आहे जंतदोष?
मोठे जंत (गोल जंत), लहान जंत (कृमी) हे लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात असतात. अशी मुले अशक्त असतात. ही मुले लवकर दमतात. त्यांच्या शरीराची वाढ खुंटू शकते. मूल अशक्त असेल, पोट मोठे असेल, ते लवकर दमत असेल, त्याच्या शरीराची वाढ योग्य तऱ्हेने होत नसेल, तर जंत झाल्याचे ओळखावे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
चौकट
आरोग्य विभागातर्फे केले जाते वाटप
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे विशेषता अंगणवाडी ते दहावीपर्यंतच्या मुलांना शाळेतच जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाते. आरोग्य सेविका, आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या मदतीनेही गोळ्यांचे वाटप होते. जिल्हा परिषदेबरोबरच सर्व शासकीय रुग्णालयातही जंतनाशक गोळ्यांचे वाटप होते.
चौकट
गोळ्यांसाठी कोणाकडे संपर्क साधायचा?
प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालयातही जंतनाशक गोळ्या उपलब्ध होत आहेत. याठिकाणी नागरिक जाऊन गोळ्या घेऊ शकतात. तसेच आरोग्य सेविका, आशा, गटप्रवर्तक यांच्याशी संपर्क साधला तरीही त्या जंतनाशक गोळ्यांची उपलब्धता करुन देऊ शकतात.