भाजप सरकारकडून कष्टकरी, शेतकऱ्यांचा विश्वासघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2016 00:19 IST2016-05-24T23:44:32+5:302016-05-25T00:19:31+5:30
जयंत पाटील : कुची येथे जि. प. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

भाजप सरकारकडून कष्टकरी, शेतकऱ्यांचा विश्वासघात
कवठेमहांकाळ : शेतकरी, कष्टकरी जनतेला खोटी आश्वासने देऊन भाजप सरकार सत्तेवर आले. सत्तेवर आल्यानंतर त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. शेतकऱ्यांपेक्षा उद्योजक, भांडवलदार त्यांना जवळचा वाटत आहे, अशी टीका विधिमंडळाचे गटनेते आमदार जयंत पाटील यांनी केली.
कुची (ता. कवठेमहांकाळ) येथे आर. आर. पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून बांधलेली पाण्याची टाकी, सभामंडप व जिल्हा परिषदेच्या नूतन सभापतींच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित पाटील, प्रा. भाऊसाहेब पाटील, सुनीता पाटील, कुसूम मोटे यांचा जयंत पाटील, आमदार सुमन पाटील यांच्याहस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, ‘महांकाली’चे अध्यक्ष विजयराव सगरे, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, गणपती सगरे, माजी सभापती गजानन कोठावळे, एम. के. पाटील आदी उपस्थित होते.
जयंत पाटील पुढे म्हणाले की, जनतेला आश्वासने देत भाजप सरकार सत्तेवर आले आहे. मात्र राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना या सरकारने केवळ तीन छावण्या काढल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी आपली जनावरे कवडीमोल दराने विकली आहेत. तरीही हे शासन घोषणा करते, पण अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरले आहे. सरकार शेतकऱ्यांच्याबाबतीत आखडता हात घेत आहे. सत्तेतील सरकारला शेतकरी, कष्टकरी जनताच आता जागा दाखवेल, असा इशाराही त्यांनी दिला.
आमदार सुमन पाटील म्हणाल्या, सरकारचे धोरण उदासीन आहे. मात्र मतदारसंघात तुम्ही विकास कामे सुचवा, ती आपण पूर्ण करू. तसेच मतदारसंघातील जनता राष्ट्रवादीच्या व आमच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, माजी सभापती सुरेखा कोळेकर, हणमंतराव देसाई, सभापती प्रा. भाऊसाहेब पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
पंचायत समितीचे उपसभापती जगन्नाथ कोळेकर, सरपंच लखन पवार, उपसरपंच परशुराम जाधव, जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांत हाक्के, भानुदास पाटील, ताजुद्दीन तांबोळी, टी. व्ही. पाटील, नामदेव करगणे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)