परीक्षेशिवाय चालणारी शिक्षणाची ढकलगाडी काय कामाची?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:23 IST2021-04-12T04:23:46+5:302021-04-12T04:23:46+5:30
सांगली : पहिली ते नववी व अकरावीच्या परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना वर्गोन्नत करण्याच्या शासनाच्या निर्णयावर पालक आणि शिक्षणतज्ज्ञांकडून नकारात्मक ...

परीक्षेशिवाय चालणारी शिक्षणाची ढकलगाडी काय कामाची?
सांगली : पहिली ते नववी व अकरावीच्या परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना वर्गोन्नत करण्याच्या शासनाच्या निर्णयावर पालक आणि शिक्षणतज्ज्ञांकडून नकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. यानिमित्ताने शासन चुकीचा पायंडा पाडत असून, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया कच्चा राहण्याचा धोका त्यांनी व्यक्त केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच वरच्या वर्गात प्रवेशाचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारा असल्याचे मत व्यक्त होत आहे. दहावी-बारावीच्या तसेच शिष्यवृत्तीच्या परीक्षा ऑफलाईन होऊ शकतात, तर इतर परीक्षा का नकोत? असा तज्ज्ञांचा प्रश्न आहे. नववी म्हणजे दहावीचा तर अकरावी म्हणजे बारावीचा पाया ठरतो. आयुष्याला वळण देणाऱ्या वर्गांची अभ्यासाची दिशा नववी व अकरावीत ठरते; पण परीक्षा न होण्याने दिशा भरकटण्याची भीती आहे. परीक्षांबद्दल विद्यार्थी व पालकांतील दबाव नाहीसा होणार आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासाची वृत्ती संपून बेफिकिरी वाढेल. तीच सवय दहावी-बारावीला कायम राहून गुणवत्तेत ती मागे पडतील, असे पालकांचे मत आहे.
भविष्यात लॉकडाऊनसारखे प्रसंग आणखी काहीवेळा येऊ शकतात. त्या वेळेसाठी मार्गदर्शक ठरतील असे निर्णय आता व्हायला हवेत. कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी शिष्यवृत्तीच्या तसेच दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणारच आहेत. तोच पॅटर्न नववी व अकरावीसाठी लावणे शक्य होते; पण परीक्षा न घेण्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन कसे करणार? असा प्रश्न पालक उपस्थित करीत आहेत.
कोट
परीक्षा न घेताच मुलांना वरच्या वर्गात प्रवेश देण्याने चुकीचा पायंडा पडत आहे. भविष्यात असाच प्रसंग येईल तेव्हा मार्गदर्शक ठरेल असा निर्णय सरकारने घ्यायला हवा होता. काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ऑफलाईन परीक्षा घेता आल्या असत्या. मुलांचे शैक्षणिक मूल्यमापन करताना आता शिक्षकांचीच परीक्षा होणार आहे. लॉकडाऊन सुरूच राहिले किंवा संसर्ग वाढतच राहिला तर दहावी-बारावीदेखील रद्द करणार काय? असा प्रश्न आहे. या निर्णयाने गुणवंत व कमी गुणवत्तेच्या अशा सर्वच विद्यार्थ्यांना एकाच पंक्तीत बसविले आहे.
- श्रीपाद जोशी, निवृत्त प्राचार्य, जत
अकरावीचे वर्ग डिसेंबरमध्ये सुरू झाले. चार महिने वर्गात अध्यापन झाले. बऱ्यापैकी अभ्यासक्रम झाला. असे असताना अचानक परीक्षा रद्दचा निर्णय अनाकलनीय आहे. निर्णय घेण्यापूर्वी प्राचार्य आणि शिक्षणतज्ज्ञांशी चर्चा करायला हवी होती. अकरावी म्हणजे बारावीचा पाया आहे. चाचण्या, तोंडी परीक्षा किंवा सराव परीक्षा यांद्वारे अकरावीचे मुल्यमापन शक्य होते. वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी पेपर शक्य होते. या सर्वांनाच नाकारून थेट परीक्षा रद्द करण्याने चुकीच्या वाटेवर प्रवास सुरू झाला आहे. मुलांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होण्याची भीती आहे.
- प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर, सांगली
नववीच्या परीक्षा रद्द करून शासनाने शिक्षकांना कोंडीत पकडले आहे. मुलांचे मूल्यमापन परीक्षा न घेताच कसे करायचे हा प्रश्न शिक्षकांपुढे आहे. या निर्णयाने गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. पालकांनाही आपल्या मुलाची गुणवत्ता कळणार नाही. दहावी आणि बारावीला विद्यार्थी व शिक्षकांची जबाबदारी आणखी वाढणार आहे.
- विठ्ठल मोहिते, अध्यक्ष, मराठी अध्यापक संघ
सध्या परीक्षा रद्द करून पुढील वर्गात प्रवेश देण्याने किमान पुढील शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू होईल. ऑनलाईनच्या माध्यमातून पुरेसा अभ्यास झालेला नाही. आता परीक्षादेखील ऑनलाईन घेतल्या तर व्यवस्थित मुल्यांकन होणार नाही. त्यामुळे परीक्षा रद्दचा निर्णय योग्यच आहे. विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी मात्र पर्याय आवश्यक होता.
- सुभाष कवडे, पालक, भिलवडी
परीक्षाच नसेल तर पाल्याने अभ्यास पूर्ण केला कसे म्हणायचे? शासनाने निर्णय घेण्यापूर्वी किमान शिक्षणतज्ज्ञांशी चर्चा करायला हवी होती. हुशार आणि कमी बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांत फरकच राहिलेला नाही. मुलांच्या गुणवत्तेसाठी परीक्षेवर विसंबून असलेले पालक अनभिज्ञच राहणार आहेत. पुढील वर्गात जबाबदारी वाढणार आहे.
- गोरख कालेकर, पालक, सांगली
चौकट
ही ढकलगाडी काय कामाची ?
पहिली ते आठवीच्या परीक्षा अनेक वर्षांपासून होत नाहीत. शाळांमध्येच मूल्यमापनाद्वारे श्रेणी दिली जाते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात नववीलाच खऱ्या अर्थाने पहिल्यांदा लेखी परीक्षा होते. प्रामाणिक मूल्यमापनाची ही संधीदेखील शासनाच्या निर्णयाने गमावली आहे. आता थेट दहावीला बोर्डाच्या परीक्षेलाच लेखी परीक्षेचा अनुभव घ्यावा लागेल. दहावी-बारावी आणि शिष्यवृत्तीच्या परीक्षा मात्र ऑफलाईनच होणार असल्याचे सांगत शासनाने अन्य वर्गांच्या परीक्षांचे महत्त्व जणू कमी केले आहे. या परीक्षा होत असतील, तर पहिली ते आठवीच्या का नाही, असा सूर पालकवर्गातून उमटला आहे.
पॉईंटर्स
वर्ग व विद्यार्थी संख्या
पहिली ३९५२६, दुसरी ४२६२७, तिसरी ४३६५८, चौथी ४३६१५५, पाचवी ४४४८३, सहावी ४३५३६, सातवी ४३६०२, आठवी ४४०९५, नववी ४५२७२, अकरावी ३३३४९.