सभागृहाच्या नामांतरावर मतभेद का?
By Admin | Updated: September 22, 2015 23:50 IST2015-09-22T23:07:47+5:302015-09-22T23:50:39+5:30
वाळवा पंचायत समिती : राष्ट्रवादीचा काँग्रेससह विरोधकांना सवाल

सभागृहाच्या नामांतरावर मतभेद का?
अशोक पाटील -इस्लामपूर -वाळवा पंचायत समितीच्या आवारातील जुनी इमारत जमीनदोस्त होणार आहे. त्याच इमारतीमधील वसंतदादा यांचे नाव असलेले सभागृहही पाडले जाणार आहे, तर नवीन इमारतीमधील सभागृहाला राजारामबापू यांचे नाव देण्याचे सत्ताधारी राष्ट्रवादीने निश्चित केले आहे. याला काँग्रेसच्या नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. वसंतदादांचा आदर करणारे नेते आजही काँग्रेससह राष्ट्रवादीमध्ये आहेत. परंतु दादांच्याच वारसदारांनी त्यांनी स्थापन केलेल्या संस्था मोडीत काढल्या आहेत. याचे ज्वलंत उदाहरण असताना, वाळवेकरांना वसंतदादांच्या नावाचा अट्टाहास का, असा प्रतिसवाल राष्ट्रवादीने काँग्रेसला विचारला आहे.पंचायत समितीच्या नवीन सभागृहाला राजारामबापूंचे नाव देण्यासाठी राष्ट्रवादीचे सभापती रवींद्र बर्डे आणि त्यांचे सदस्य ठाम आहेत; तर काँग्रेसचे सदस्य प्रकाश पाटील यांनी पूर्वीचेच वसंतदादांचे नाव कायम ठेवण्याची मागणी केली आहे. याला जिल्हा परिषदेच्या तीन माजी सदस्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे दादा-बापू समर्थकांतील वाद पेटला आहे. यावर विरोधी पक्ष आणि इतर मोठे नेते भाष्य करत नाहीत.राष्ट्रवादीतील काही पदाधिकाऱ्यांनी याबाबत आपले नाव न छापण्याच्या अटीवर काँग्रेसच्या नेत्यांना प्रतिसवाल केले आहेत. वसंतदादांचे कार्य मोठे आहे. त्यांनी आशिया खंडात सर्वात मोठा साखर कारखाना उभा केला. तो त्यांच्या वारसदारांनी मोडीत काढला आहे. त्यांच्याच नावाची असलेली सहकारी बँक बुडाली आहे. राज्यात त्यांच्या नावे असलेल्या सहकारी संस्थांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची बदनामीच होत चालली आहे. याउलट वाळवा तालुक्यात राजारामबापू पाटील यांनी सुरू केलेल्या संस्थांचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. आर्थिक संस्थांनीही घोडदौड करत राज्यभर विस्तार केला आहे. शिक्षण संस्थांचे नावही राज्यभर गाजले आहे. त्यामुळे वाळवा तालुक्यातील पंचायत समिती सभागृहाला राजारामबापूंचे नाव देण्यात काहीच गैर नसल्याचेही सांगण्यात आले.
वाळवा तालुक्याचे भाग्यविधाते, लोकनेते राजारामबापू पाटील यांनी स्थापन केलेल्या संस्था राज्यात अग्रेसर आहेत. या सर्वच संस्थांमधून हजारो हातांना काम मिळाले आहे. शेतकऱ्यांच्या मालाला दर मिळावा म्हणून सर्व सहकारी संस्था उभ्या करण्यात बापूंचे योगदान आहे. तालुक्यातील इंचन इंच जमीन ओलिताखाली येण्यासाठी त्यांनी पाणी परवाने काढले नसते, तर आजचे वाळवा तालुक्याचे चित्र वेगळे असते. त्यामुळे वाळवा तालुक्यातील सर्वच संस्थांना त्यांचे नाव दिले तर यात गैर ते काय?
- विनायकराव पाटील,
अध्यक्ष राजारामबापू दूध संघ.
विलासराव शिंदे यांचे मौन
वाळवा पंचायत समिती सभागृहाच्या नावाचा वाद तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे. १९८० मध्ये लोकनेते राजारामबापू पाटील यांनी जनता पक्षातून वाळवा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, तर वसंतदादांच्या ताकदीवर विलासराव शिंदे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर बापूंचा पराभव केला होता. तेच विलासराव शिंदे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी या नामांतराबाबत मौन पाळणे पसंद केले आहे.