तीन गावांचा पाणी पुरवठा अखेर सुरळीत
By Admin | Updated: November 23, 2015 00:31 IST2015-11-22T23:06:19+5:302015-11-23T00:31:54+5:30
वीज बिल भरले : माळवाडी, खंडोबाचीवाडी, चोपडेवाडीतील ग्रामस्थांची गैरसोय दूर

तीन गावांचा पाणी पुरवठा अखेर सुरळीत
भिलवडी : वीज कनेक्शन तोडल्याने पलूस तालुक्यातील माळवाडी, खंडोबाचीवाडी, चोपडेवाडी या गावांचा बंद असलेला पाणी पुरवठा सलग तीन दिवसांनंतर पूर्ववत सुरू झाला आहे. पलूस पंचायत समितीचे सदस्य संदीप राजोबा यांनी तिन्ही ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय साधून वीज बिलाची बाकी भरण्यासाठी योग्य तोडगा काढला. या तिन्ही गावांची मिळून संयुक्त अशी नळ पाणी पुरवठा योजना आहे. त्याचे वीज बिल साडेसहा ते सात लाख रूपये थकित आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने बिल भरल्याशिवाय कनेक्शन सुरू करणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला होता. यामुळे गेले तीन दिवस या गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागले. माळवाडी ग्रामपंचायतीची ६० टक्के, खंडोबाचीवाडी ग्रामपंचायत २१ टक्के, तर चोपडेवाडी ग्रामपंचायतीची १९ टक्के, अशी वीज बिलाची रक्कम भरण्याचे विवरण आहे. पलूस पंचायत समितीचे सभापती विजय कांबळे, माळवाडीचे सरपंच जनार्दन साळुंखे, गजानन मोहिते, चोपडेवाडीचे उपसरपंच रवींद्र यादव, खंडोबाचीवाडीचे नेते माणिक माने, सरपंच सौ. रूपाली बाबर, उपसरपंच विशाल शिंदे, संदीप माळी, महादेव महिंद आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.वीज बिलाची रक्कम कोणी किती भरली व देणे कोण आहे, यावरून सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण झाले. यावेळी संदीप राजोबा यांनी, पाठीमागील सात वर्षांचा वीज बिलाचा ताळेबंद सर्वांनी तयार करावा व कोणती ग्रामपंचायत थकित आहे ते बघून वसुलीसाठी तोडगा काढावा, असे सुचविले. यावेळी खंडोबाचीवाडी ग्रामपंचायतीने पन्नास हजार व चोपडेवाडी ग्रामपंचायतीने पन्नास हजार, असे मिळून एक लाख रूपये भरले. त्यानंतर वीज पुरवठा पूर्ववत झाल्याने रविवारी सकाळपासून तिन्ही गावांना पाणी पुरवठा नियमितपणे सुरू झाला.(वार्ताहर)
‘लोकमत’चे अभिनंदन
सलग तीन दिवस पाणी पुरवठा बंद असल्याचे सडेतोड वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द केले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी धावपळ करून तात्काळ योग्य तो तोडगा काढला. याबाबत ग्रामस्थांनी ‘लोकमत’चे अभिनंदन केले.