शिराळ्यातील १७ गावांत पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:26 IST2021-05-08T04:26:32+5:302021-05-08T04:26:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : तालुक्यात पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. तालुक्यातील १७ गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून, तालुक्यातील ...

शिराळ्यातील १७ गावांत पाणीटंचाई
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : तालुक्यात पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. तालुक्यातील १७ गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून, तालुक्यातील सात गावांतून टॅंकरची मागणी करण्यात आली आहे. आठ गावांतील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
शिवणी व रेठरे धरणातील पाणीसाठा संपला आहे. तालुक्यातील काळोखेवाडी, जाळकेवाडी, खराळे, वाकाईवाडी, बेरडेवाडी, येसलेवाडी, करूंगली या गावांतून टॅंकरची मागणी करण्यात आली आहे. आठ गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने रांजणवाडी, बेगडेवाडी, शिंदवाडी, खेड, बेलदारवाडी, रेड, शिरसटवाडी, कांबळेवाडी या गावांतील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
मादळगाव, यादवमळा करमाळे, येळापूर, काळोखेवाडी, कुंभाडेवाडी या गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजना करण्यात येणार आहे. मोरणा धरणात वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेचे पाणी आल्याने शेतऱ्यांना दिलासा मिळाला आहे. रेठरे धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपला असून, शिवणी धरणात १० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर कार्वे धरणात १८ टक्के पाणीसाठा आहे.
वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेचे पाणी आमदार मानसिंगराव नाईक, कार्यकारी अभियंता वारणा कालवे विभाग इस्लामपूर डी. डी. शिंदे, कार्यकारी अभियंता सांगली पाटबंधारे ज्योती देवकर, उपविभागीय अभियंता लालासाहेब मोरे, शाखा अधिकारी सी. बी. यादव, शाखा अभियंता एस. डी. देसाई, एस. के. पाटील यांनी नियोजन करून सुरुवातीला अंत्री तलावात पाणी सोडण्यात आले होते. आणखी पाणी घेण्याची गरज आहे. तरच वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेचे पाणी मोरणा धरणातून मांगले गावापर्यंत जाणार आहे.
चाैकट
२२ पाझर तलाव कोरडे
तालुक्यातील २२ पाझर तलाव कोरडे पडले आहेत. आठ पाझर तलावांतील पाणीसाठा २० टक्के राहिला आहे. विहिरीतील पाणीसाठा कडक ऊन पडत असल्यामुळे झपाट्याने कमी होत आहे. तालुक्यात ५३० कूपनलिका असून, त्यातील ४३ बंद आहेत.