पाणी योजनांवरून हल्लाबोल

By Admin | Updated: December 15, 2015 23:24 IST2015-12-15T22:51:11+5:302015-12-15T23:24:15+5:30

तासगाव पंचायत समिती सभा : शासनाच्या विभागांकडून हलगर्जीपणा

Water schemes attack | पाणी योजनांवरून हल्लाबोल

पाणी योजनांवरून हल्लाबोल

तासगाव : तासगाव तालुक्यात शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतीच्या पाणी योजनांसाठी दुप्पट वीजबिल वसूल केले जात आहे. प्रादेशिकच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रशासनाकडून आणि शासनाकडून हालगर्जीपणा केला जात आहे, अशा शब्दात टंचाई आणि पाणी योजनांवरून पंचायत समितीच्या सदस्यांनी मासिक सभेत हल्लाबोल केला.
राज्य शासनाच्या अनेक विभागाकडील अधिकाऱ्यांकडून सदस्यांच्या मागण्यांबाबत हालगर्जीपणा केला जात असल्याचा आरोपही यावेळी संतप्त सदस्यांनी केला.सभापती सुनीता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीची सभा झाली. गटविकास अधिकारी सतीश गाढवे, उपसभापती अशोक घाईल यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. तालुक्यात शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. विसापूर, पुणदी योजनांतून पाणी मिळत नाही. पाणी पाहिजे असल्यास दुप्पट वीजबिलाची वसुली केली जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला. पुणदी उपसा योजनेत सावळजचा समावेश नसल्याबाबत अधिकाऱ्यांकडून दिशाभूल केली जात आहे. सावळजच्या ग्रामस्थांनी पैसे भरले म्हणून पाणी दिले असेल तर, योजनेत नसलेल्या सर्वच गावांना असे पाणी देणार आहात का? असा प्रश्न उपस्थित करून सावळजला पुणदी योजनेचे पाणी मिळायलाच हवे, अशी मागणी व्यक्त केली.
पुणदी योजनेचे पाणी घेण्यासाठी पुणदीसह ताकारी योजनेचे दुहेरी वीजबिल शेतकऱ्यांच्या माथी मारले जात असल्याची टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली.
सदस्य विश्वास पाटील, प्रभाकर पाटील, शिवाजी पाटील यांनीही पाणी प्रश्नाबाबत शासन गाफील असल्याचा आरोप केला. तालुक्यातील पाणी योजना बंदअवस्थेत असल्यामुळे द्राक्षबागांसाठी टँकर सुरू करावे लागत आहेत. प्रादेशिक योजनांतील १४ गावांनी शंभर टक्के पाणीपट्टी भरली आहे. तरीही अन्य गावांच्या वसुलीअभावी मणेराजुरी, विसापूर योजना बंद झाली आहे. टंचाई निधीतून शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही सदस्यांनी यावेळी व्यक्त केली.
शासनाकडील सार्वजनिक बांधकाम, महावितरणसह अन्य विभागांकडून नागरिकांच्या समस्या मार्गी लावल्या जात नाहीत. सदस्यांनी मागणी केलेली कामे तीन वर्षांपासून मार्गी लागलेली नाहीत. काही विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कामात हालगर्जीपणा केला जात आहे. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी उपसभापती अशोक घाईल, सदस्य शिवाजी पाटील यांनी केली. तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तासगाव ते वासुंबे रस्ता आणि तासगाव ते आरवडे रस्ता असल्याचा आरोप सदस्य जयवंत माळी यांनी केला. (वार्ताहर)

सभेतील प्रमुख निर्णय, ठराव
तासगाव तालुका तात्काळ दुष्काळ जाहीर करा
अनधिकृत नळ कनेक्शनधारकांसाठी ७० अधिकारी, कर्मचाऱ्यांची टीम
अनधिकृत नळकनेक्शनधारक आढळल्यास संबंधितांवर कारवाईचा निर्णय.
पाणी योजनांची पाणीपट्टी माफ करा

Web Title: Water schemes attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.