‘माणगंगा’च्या रिंगणात चुरशीचे ‘पाणी’
By Admin | Updated: May 27, 2015 00:58 IST2015-05-26T23:12:11+5:302015-05-27T00:58:26+5:30
देशमुखांना आव्हान : गोपीचंद पडळकरांच्या परिवर्तन पॅनेलमुळे तुल्यबळ लढत

‘माणगंगा’च्या रिंगणात चुरशीचे ‘पाणी’
अविनाश बाड -आटपाडी -एरवी वर्षानुवर्षे कोरड्या असणाऱ्या इथल्या माणगंगा नदीला जणू पूर यावा, अगदी तशी माणगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची अवस्था झाली आहे. कारखान्याची स्थापना झाल्यापासून यंदा प्रथमच माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सहकारी पॅनेल आणि भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखालील माणगंगा परिवर्तन पॅनेलच्या प्रचाराच्या वर्षावात ऐन उन्हाळ्यात कारखाना आणि सभासद चिंब भिजून गेले आहेत.
बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दि. २५ नोव्हेंबर १९८१ रोजी कारखान्याची नोंदणी झाली. कारखान्याची स्थापना १९८५ मध्ये झाली, तर १९८७ मध्ये पहिले गाळप झाले आणि तालुक्यात एका नवीन पर्वाची सुरूवात झाली.
सदैव दुष्काळी असलेल्या या भागात कारखान्याच्या निर्मितीपासूनच उलटसुलट चर्चांना उधाण आले. जिथे प्यायला पाणी नाही, तिथे कारखान्यात उसाऐवजी काय माळावरची कुसळे घालून साखर तयार करणार काय? अशा प्रश्नांनी हेटाळणीही झाली. पण अपवाद वगळता भीषण दुष्काळी परिस्थितीतही अगदी टॅँकरने पाणी आणून कारखाना सुरू ठेवण्यात आला. कारखान्याला कायमस्वरूपी पाण्याची टंचाई भासू नये यासाठी पिलीव (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथून जलवाहिनीने पाणी आणण्यात आले.
माणगंगा साखर कारखाना म्हणजे देशमुख गटाची मोठी राजकीय ताकद आहे. सध्या राजेंद्रअण्णा देशमुख, सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख, आ. दीपक साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी सहकारी पॅनेलने सभासदांची थेट भेट घेण्याचा आणि सभांचा धडाका लावला आहे.
कारखान्याच्या स्थापनेपासून गेल्या २० वर्षांत निवडणुकीची एवढी चुरस निर्माण होण्याचे एकमेव कारण म्हणजे, भाजपचे नेते गोपीचंद पडळकर. त्यांनी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन सभासदांसमोर प्रस्थापित देशमुख गटाच्या कारभारावर आरोपांच्या फैरी झाडल्याने प्रचारात आतापासूनच रंगत आली आहे. वाहनांवर ध्वनिक्षेपक लावून प्रचार सुरू आहे. कारखान्याच्या इतिसाहात प्रथमच सभासदांना या निवडणुकीत मते देण्याचे आवाहन केले जात आहे. गुरुवार, दि. २८ मे रोजी मतदान होणार आहे. सत्ताधारी देशमुख गटाला आव्हान देणाऱ्या पडळकर गटाचे भवितव्य या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.
माणगंगा-कृष्णा मीलनाने संघर्षात वाढ
टेंभूचे पाणी विधानसभा निवडणुकीपूर्वी आटपाडी तालुक्यात दाखल झाले. नुकतेच निंबवडे तलावातून विठलापूरच्या ओढ्यातून माणगंगा नदीला मिळाले. त्यामुळे भविष्यात सामूहिक ठिबक सिंचन अथवा पाणी उपलब्ध झाल्यामुळे परिसरात उसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कारखान्याचा उसाचा दुष्काळ संपण्याची शक्यता आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी-भाजपबरोबर शिवसेनेनेही उडी घेतली होती. पण त्यांनी माघार घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा प्रस्थापित नेते विरुद्ध पडळकर, असा सामना रंगला आहे.