वाळेखिंडीत नागरिकांनीच अवैध व्यवसाय बंद पाडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:23 IST2021-04-19T04:23:43+5:302021-04-19T04:23:43+5:30
जत : वाळेखिंडी (ता. जत) येथील अवैध व्यवसायाच्या विरोधात तक्रार करूनही तो बंद करण्यास पोलिसांनी नकार दिल्यानंतर गावातील प्रतिष्ठित ...

वाळेखिंडीत नागरिकांनीच अवैध व्यवसाय बंद पाडला
जत : वाळेखिंडी (ता. जत) येथील अवैध व्यवसायाच्या विरोधात तक्रार करूनही तो बंद करण्यास पोलिसांनी नकार दिल्यानंतर गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन अवैध व्यवसाय बंद केले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेबद्दल नागरिकांतून नाराजी तर नागरिकांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
वाळेखिंडी गावातील पानटपरी, चहाटपरी व अतिक्रमण करून सुरू केलेल्या इतर काही ठरावीक दुकानातून बिनधास्तपणे अवैध व्यवसाय सुरू होते. ग्रामस्थांना हे खटकत होते. परंतु तक्रार होत नसल्यामुळे व्यावसायिक गैरफायदा घेत होते. गावातील मुख्य प्रवेशद्वार व एसटी पिकअप शेडसमोर असणाऱ्या मुख्य रस्त्यालगत हे व्यवसाय सुरू होते. याचा त्रास रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महिलांना व नागरिकांना सहन करावा लागत होता.
माजी सरपंच एन. डी. शिंदे यांनी पोलीस निरीक्षक उत्तम जाधव यांना फोन करून व प्रत्यक्ष भेटून व्यवसाय बंद करण्याची मागणी केली होती. परंतु पोलिसांकडून काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे एन. डी. शिंदे, जत पंचायत समिती माजी उपसभापती व विद्यमान सदस्य शिवाजी शिंदे, विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष तानाजी शिंदे यांनी अवैध व्यावसायिकांना एकत्रित बोलावून घेतले. गावात शांतता राखण्यासाठी व्यवसाय बंद करण्याचा सज्जड दम दिल्यानंतर व्यावसायिकांनी अवैध धंदे बंद केले आहेत.
यापुढे अवैध व्यवसाय पुन्हा सुरू झाल्यास राज्याचे गृहमंत्री व जिल्हा पोलीस प्रमुखांना लेखी निवेदन देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन एन. डी. शिंदे यांनी केले आहे.