कवठेमहांकाळकर नाट्यगृहाच्या प्रतीक्षेत!
By Admin | Updated: June 4, 2015 00:01 IST2015-06-03T23:05:31+5:302015-06-04T00:01:12+5:30
कलाकारांमधून संताप : प्रशासकीय पातळीवर अनास्थाच, दहा वर्षांपासून बांधकाम रखडले

कवठेमहांकाळकर नाट्यगृहाच्या प्रतीक्षेत!
अर्जुन कर्पे - कवठेमहांकाळ -सांगली जिल्ह्यातील नाट्यकलाकार, तमाशा कलाकार, लेखक, साहित्यिक, नाटककार यांचे प्रमुख केंद्र असलेला कवठेमहांकाळ तालुका वर्षानुवर्षे झाली तरी नाट्यगृहाच्या प्रतीक्षेतच आहे. दहा वर्षांपूवी सुरू केलेल्या नाट्यगृहाचे बांधकाम अर्ध्यावरच पडले आहे. त्यामुळे तालुक्यातील कलाकार व साहित्यिकांमधून संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. आज ही नाट्यगृहाची अर्धवट इमारत लहान बालकांचे क्रिकेटचे क्रीडांगण बनले आहे.
सांगली जिल्ह्यात दुष्काळी तालुका म्हणून कवठेमहांकाळची ओळख असली तरी, गुणवत्ता, कला, संस्कृती, पारंपरिक वाद्यकला, नृत्यकला याबाबतीत हा तालुका नेहमीच अग्रेसर राहिला आहे. परंतु येथील सांस्कृतिक कला टिकावी, ती जोपासली जावी, जतन केली जावी यासाठी शासनपातळीवरून पुरेशी मदत व प्रयत्न झाले नाहीत. येथील कला आणि कलाकार आजही उपेक्षितच आहेत.
तमाशा कलावंत नामदेव इरळीकर, शालन खिलारे, दत्तोबा तिसंगीकर, तसेच साहित्य क्षेत्रात चारूता सागर, डॉ. अशोक बाबर, प्रा. जी. के. ऐनापुरे, नाटककार, शाहिरी क्षेत्रात बाळ जगताप, राजा पाटील असे अनेक साहित्यिक, कलाकार या तालुक्यात नावारूपाला आले. परंतु, त्यांच्या कला सादरीकरणाला कुठेही आजअखेर ना हक्काची जागा मिळाली, ना हक्काचे नाट्यगृह. जत्रा आली की तंबू मारून कला सादर करण्यावरच यांनी आजवर दिवस घालवले. आजही हे सर्व क्षेत्रातील कलाकार, नाटककार, साहित्यिक, हक्काचे नाट्यगृह मिळावे यासाठी प्रतीक्षा करीत आहेत. त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांच्या हक्काचे नाट्यगृह कवठेमहांकाळ शहराच्या ठिकाणी होणार की नाही? असा थेट सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.
दहा वर्षांपूर्वी कवठेमहांकाळ शहरात तब्बल चाळीस ते पन्नास लाख खर्चाचे नाट्यगृह तत्कालीन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले. प्रत्यक्ष कामालाही सुरूवात करण्यात आली. परंतु हे काम त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांनी मर्जीतल्या ठेकेदाराला दिले. या नाट्यगृहावर त्यावेळी २० लाख रुपये खर्च करण्यात आले. परंतु, या खर्चाच्या मानाने येथे काहीच करण्यात आले नाही. केवळ पोल्ट्रीचे शेड मारावे, असा भलामोठा आकार देऊन नाट्यगृहाच्या नावाखाली फक्त विटा रचून व पत्रे टाकून शेड बांधले आहे. त्याचे बांधकामही निकृष्ट दर्जाचे आहे. दहा वर्षे झाली, त्यापुढे नाट्यगृहाचे काम झाले नाही. ते अर्ध्यावरच रखडले आहे. या इमारतीत बालके क्रिकेट खेळत आहेत.
तालुक्यात मोठ्या राजकीय नेत्याची सभा असो की, सामाजिक कार्यक्रम, तालुक्यात कुठेही असे सभागृह व नाट्यगृह नाही. याचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी कलाकारांमधून मागणी होऊ लागली आहे.
राजकारण्यांची उदासीनता
नाट्यगृहाचे काम रखडण्यामागे राजकारणी नेत्यांची उदासीनता दिसून येते. ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांचे जुन्या कामांकडे बघण्याचा दृष्टिकोन व दुर्लक्षही दिसून येते. या कामावर किती निधी खर्च झाला, याची चौकशी करावी, अशी मागणी कला, साहित्य क्षेत्रातील व तालुक्यातील नागरिक करू लागले आहेत. या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून, या कामाची चौकशी करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
तालुक्यातील कलाकारांना, नाटककारांना कला सादर करण्यासाठी शहराच्या ठिकाणी भाडेट्ट्यावरसुध्दा सभागृह मिळत नाही. नाट्यगृह हा कला, साहित्य क्षेत्रातील जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने तो तात्काळ मार्गी लावावा.