रब्बीला प्रतीक्षा कडाक्याच्या थंडीची, शाळू, हरभऱ्याची वाढ मंदावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:38 IST2020-12-14T04:38:11+5:302020-12-14T04:38:11+5:30
फोटो १३ संतोष ०१ यंदा चांगल्या पाऊसमानामुळे शाळू बहरला असला तरी, आता पुरेशा थंडीची आवश्यकता आहे. -- लोकमत न्यूज ...

रब्बीला प्रतीक्षा कडाक्याच्या थंडीची, शाळू, हरभऱ्याची वाढ मंदावली
फोटो १३ संतोष ०१
यंदा चांगल्या पाऊसमानामुळे शाळू बहरला असला तरी, आता पुरेशा थंडीची आवश्यकता आहे.
--
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : डिसेंबरचा पंधरवडा संपला तरी जिल्ह्यात कडाक्याची थंडी सुरू झालेली नाही. कधी थंडी तर कधी उष्णता, अशा लहरी हवामानामुळे रब्बीची वाढ मंदावली आहे. विशेषत: शाळू व हरभरा पिकासाठी पोषक ठरणाऱ्या थंडीची अजूनही प्रतीक्षाच आहे.
एरवी नोव्हेंबर महिना थंडी घेऊनच येतो. पण यंदा तशी स्थिती नाही. डिसेंबरचा पंधरवडा संपला तरी अजूनही कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे. रात्री उशिरापर्यंत तापमानाचा पारा चढलेलाच असतो. पहाटे थोडासा कडाका वाढतो, पण दिवसभर उन्हे तापलेली असतात. या विचित्र हवामामुळे रब्बीच्या पिकांना पोषक वातावरण मिळेनासे झाले आहे. शाळू, हरभरा, गहू, करडई ही पिके म्हणावी तशी पोसलेली नाहीत.
यंदा पुरेशा पावसामुळे विहिरी, कूपनलिकांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. त्याच्याआधारे, शाळू, हरभरा फुलविण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. द्राक्षबागांसाठी मात्र वाढते तापमान फायद्याचे ठरत आहे. सध्या फळधारणा सुरू असून बागा चांगल्याच पोसवल्या आहेत. कमी प्रमाणातील थंडीमुळे द्राक्षमणी तडकण्याचा धोका टळला आहे.
चौकट
धुक्यामुळे चिकटा
पहाटेच्या सुमारास धुक्याची चादर पसरत असल्याने शाळूवर चिकट्याचा प्रादुर्भाव होत आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हात उष्णतेचा अभाव असल्याने धुके उशिरापर्यंत टिकून राहते, ही बाब शेतकऱ्यांसाठी चिंतेची ठरली आहे.
कोट
सध्या शाळू पोटरीतून बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे. गारठा वाढला तरच कणसे चांगली भरतील. दिवसभराच्या वाढत्या तापमानामुळे जमिनीतील ओलावा हरवत आहे.
- किरण शेळके, शेतकरी, बेडग
-------------
--------