व्यंकाप्पा पत्की यांचे निधन
By Admin | Updated: June 15, 2014 00:22 IST2014-06-15T00:16:42+5:302014-06-15T00:22:35+5:30
सांगलीच्या राजकारणात अभ्यासू राजकारणी म्हणून प्रदीर्घ काळ छाप

व्यंकाप्पा पत्की यांचे निधन
सांगली : सांगलीच्या राजकारणात अभ्यासू राजकारणी म्हणून प्रदीर्घ काळ आपली छाप सोडणारे माजी आमदार व्यंकाप्पा ऊर्फ व्यंकटेश नारायण पत्की (वय ६५) यांचे आज, शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता दीर्घ आजाराने निधन झाले.
मिरजेतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सायंकाळी त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. सांगलीच्या राजकारणावर प्रदीर्घ काळ त्यांचा प्रभाव होता. राजकारणातील चाणक्य म्हणूनही ते परिचित होते. सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात शास्त्र शाखेची व एन. एस. विधी महाविद्यालयात कायद्याची पदवी प्राप्त केल्यानंतर युवक क्रांती दलाच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थी चळवळीत काम केले. १९७५ ते ७७ च्या कालावधित आणीबाणीत त्यांना १९ महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला. समाजवादी पक्ष, जनता दलाच्या माध्यमातून त्यांनी राजकीय कारकीर्द घडविली. राजारामबापू यांचे ते अनुयायी होते. राजारामबापूंनी कॉँग्रेस सोडून जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर पत्कीही त्यांच्यासोबत होते. सांगलीच्या राजकारणातही त्यांचा दबदबा होता. आ. संभाजी पवार, प्रा. शरद पाटील यांच्या राजकीय जडणघडणीतही त्यांचा वाटा होता. १९९४ ते २००० या कालावधित त्यांनी विधानपरिषदेवर काम केले. सभागृहात कायदेशीर व अभ्यासपूर्ण भाषणांनी त्यांनी प्रभाव पाडला. २००० मध्ये त्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणून गौरविण्यात आले होते.
कारंदवाडी (ता. वाळवा) येथील सर्वोदय सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक-अध्यक्ष होते. लोकनायक शिक्षण संस्थेचे संस्थापक तसेच विविध शासकीय, निमशासकीय समित्या, संस्थांवर त्यांनी काम केले. ग्रंथालय चळवळीतही त्यांचा मोठा वाटा आहे. ग्रंथालयांच्या विविध प्रश्नांसंदर्भात पत्की यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने अभ्यास समिती नियुक्त केली होती. पत्की अहवाल म्हणून तो सभागृहात सादर झाला होता. सांगलीच्या राजकारणातील सुरुवात नगरपालिकेच्या माध्यमातून झाली. नागरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी १९८५ ते १९९० या कालावधित स्वीकृत नगरसेवक म्हणून काम केले. सर्वोदय कारखान्याचे पद सोडल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून ते राजकारणापासून अलिप्त होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून, नातू असा परिवार आहे. (प्रतिनिधी)