‘विसापूर-पुणदी’चे निव्वळ राजकारण!

By Admin | Updated: May 28, 2015 00:59 IST2015-05-28T00:40:09+5:302015-05-28T00:59:36+5:30

ग्रामस्थांमध्ये फसवणुकीची भावना : आठ गावांमधील दुष्काळ संपणार कधी?

Visapur-Punadi's net politics! | ‘विसापूर-पुणदी’चे निव्वळ राजकारण!

‘विसापूर-पुणदी’चे निव्वळ राजकारण!

प्रवीण पाटील - सावळज -तासगाव पूर्व भागाचा दुष्काळ कायमचा संपविण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी अथक् प्रयत्नातून विसापूर-पुणदी ही २७५ कोटी रुपये खर्चाची योजना पूर्ण केली. मात्र ज्या पूर्व भागातील आठ गावांसाठी ही योजना करण्यात आली, त्या आठ गावांचाच या योजनेत समावेश नसल्यामुळे जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नेत्यांकडून या आठ गावांतील जनतेची फसवणूक झाल्याची भावना आहे.
सावळज, वायफळे, यमगरवाडी, बिरणवाडी, जरंडी, दहीवडी, सिध्देवाडी, डोंगरसोनी या गावांचा या योजनेत समावेश झालेला नाही. त्यामुळे या गावांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. सिध्देवाडी तलावामध्ये पुणदी योजनेचे पाणी टाकून तेथून या गावांना पाणी मिळणार होते. मात्र या योजनेत या गावांचा समावेशच नसल्यामुळे पाणी मिळण्याचा प्रश्नच येत नाही.
सावळज जिल्हा परिषद गटातूनच आर. आर. पाटील यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यानंतर कायम या भागातील जनतेने शेवटपर्यंत त्यांना साथ दिली. मात्र आज याच लोकांना शेतीसाठी तर सोडाच, पण पिण्यासाठीही पुरेसे पाणी नसल्याची परिस्थिती आहे. कमीत कमी पाण्यावर द्राक्षबागांच्या माध्यमातून या भागातील शेतकऱ्यांनी क्रांती केली. मात्र सततच्या दुष्काळामुळे द्राक्षबागा काढाव्या लागल्या.
गेल्या वीस वर्षांपासून शेतीला कायमस्वरूपी पाणी मिळण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी सर्व प्रयत्न केले. पुणदी योजना पूर्ण झाल्यानंतर या भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या, पण या योजनेत समावेशच नसल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या आशेला निराशेचे ग्रहण लागले आहे.
तत्कालीन आमदार संजय पाटील यांनी या योजनेत या गावांचा समावेश नसल्यामुळे आर. आर. पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर परिस्थिती बदलली. सध्या राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार आले आहे. संजय पाटील खासदार झाले. मात्र खासदारांनी वर्षभरात या गावांचा समावेश या योजनेत का केला नाही?, असा सवाल या भागातील शेतकरी विचारत आहेत.
आतापर्यंत सर्वच नेत्यांनी या योजनेचे भांडवल करून राजकीय स्वार्थ साधला. मात्र या आठ गावांतील लोकांचा नेत्यांनी विश्वासघात केला आहे. आतापर्यंत आश्वासने मिळाली, मात्र पाणी मिळालेले नाही. अजून किती काळ नेते नुसती आश्वासनेच देणार?, असा सवाल ग्रामस्थांतून होत आहे. विद्यमान आमदार व खासदारांनी या गावांचा या योजनेत समावेश करावा, अशी मागणी होत आहे.


ना घर का ना घाट का !
विसापूर-पुणदी योजनेत समावेश करण्यासाठी यापूर्वी या गावांकरिता टेंभू योजनेतून तामखडी येथून अग्रणीतून सिध्देवाडी तलावामध्ये पाणी उपलब्ध करून देण्यात येणार होते. मात्र विसापूर-पुणदी योजनेची चर्चा सुरू झाल्यानंतर टेंभू योजनेतून ही गावे वगळण्यात आली. बदलत्या परिस्थितीत विसापूर-पुणदी योजनेतही या गावांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे ‘ना घर का ना घाट का’ अशी या गावांची अवस्था झाली आहे.
या योजनेसाठी वापरल्या गेलेल्या जलवाहिन्या निकृष्ट दर्जाच्या आहेत. त्यामुळे ही योजना पूर्ण क्षमतेने सुरू केल्यानंतर अडचणी येणार आहेत. याचा प्रत्यय आरवडे येथे जलवाहिनी फुटल्यानंतर आला. एका नेत्याच्या निकटवर्तीयाच्या कारखान्यातून या जलवाहिन्या घेतल्या असून, त्या हलक्या दर्जाच्या आहेत, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याने खासगीत दिली.

Web Title: Visapur-Punadi's net politics!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.