वैभव नायकवडींची राजकीय कसरत

By Admin | Updated: November 27, 2015 00:06 IST2015-11-26T22:52:05+5:302015-11-27T00:06:20+5:30

वाळव्याचे राजकारण : काँग्रेस-राष्ट्रवादीनंतर आता ‘हुतात्मा’वर भाजपसाठी पायघड्या

Vaibhav Nayakvadi's State Exercise | वैभव नायकवडींची राजकीय कसरत

वैभव नायकवडींची राजकीय कसरत

अशोक पाटील --इस्लामपूर--वैभव नायकवडी यांनी वाळव्याचे हुतात्मा संकुल कोणत्याही पक्षाच्या दावणीला न बांधता, सर्वच पक्षांतील राजकीय नेत्यांना समान अंतरावर ठेवले आहे. भविष्यातील राजकीय आडाखे बांधत त्यांनी संकुलाला उभारी दिली आहे. मात्र हा राजकीय समतोल साधताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
हुतात्मा उद्योग समूहाचे शिल्पकार, क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांचे नाव घेतले की, राजकीय नेत्यांच्या उरात धडकी भरत होती. कोणत्याही मतदारसंघात जाऊन निवडणूक लढविण्याचे धाडस त्यांच्याकडे होते. त्यांचे पुत्र वैभव नायकवडी यांनी माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात विधानसभेची एक निवडणूक लढवली. पण यामध्ये त्यांना अपयश आले. मात्र त्यानंतर त्यांचे राजकीय आलेखाकडे काहीसे दुर्लक्ष झाले. परिणामी त्यांच्या परिसरात जयंत पाटील गटानेही शिरकाव केला.
एकेकाळी वाळवा तालुक्याच्या धडाकेबाज कामगिरीने सारा महाराष्ट्र हादरत होता. या तालुक्यातील क्रांतिकारकांनी इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले होते. त्यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील आणि नागनाथअण्णांनी प्रति सरकारच्या माध्यमातून गावगुंडांनाही चाप लावला होता. स्वातंत्र्यानंतरही वाळव्याचा सर्वच क्षेत्रात दबदबा राहिला. डाव्या विचारसरणीच्या नागनाथअण्णांनी सत्ताधाऱ्यांविरोधात अनेक आंदोलने केली. राजारामबापू पाटील यांना आव्हान देत वाळव्यात हुतात्मा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. साखर उताऱ्यात देशात पहिला क्रमांक पटकावणारा हा कारखाना आता सभासदांना उच्चांकी दर देण्यात आघाडीवर आहे. अण्णांच्यानंतर वैभव नायकवडी यांनी हुतात्मा संकुलाची जबाबदारी समर्थपणे पेलली आहे. परंतु राजकीय क्षेत्रात त्यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही. तथापि हुतात्मा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात त्यांच्या गटाचे राजकीय प्राबल्य बऱ्यापैकी दिसून येते. विधानसभेच्या पराभवानंतर नायकवडी यांचे राजकीय क्षेत्राकडे काहीसे दुर्लक्ष झाले. त्यातच त्यांनी सर्वच पक्षांतील नेत्यांना समान अंतरावर ठेवण्याची कसरत सुरु ठेवली आहे. कोणत्याही एका पक्षाचा झेंडा पाठीशी नसल्याचा फटका त्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत बसला.
आता वाळव्यात राज्यस्तरीय खो—खो स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेचे उद्घाटन सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. उद्घाटनापूर्वी वैभव नायकवडी यांच्या भूमिकेविषयी उलट—सुलट चर्चा सुरु असतानाच, चंद्रकांतदादांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमात त्यांना भाजप प्रवेशाची आॅफर दिली. यापूर्वी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, डॉ. पतंगराव कदम, राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी नायकवडी यांना काँग्रेस—राष्ट्रवादीत येण्याची आॅफर दिली होती. परंतु नायकवडी यांनी आॅफर दिलेल्या सर्वच नेत्यांना नम्रपणे नकार दिला होता. तेव्हापासून नायकवडी यांनी पक्षात बोलावणाऱ्या सर्वच नेत्यांचे हुतात्मा संकुलावर स्वागत करून, त्यांना समान अंतरावर ठेवण्यात यश मिळवले आहे. डाव्या विचारप्रणालीसोबत राहणाऱ्या वैभव नायकवडी यांनी आता थेट भाजपच्या मंत्र्यांना कारखान्यावर निमंत्रित केल्याने, अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र हुतात्मा संकुलावर सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त राहावा, यासाठीच त्यांनी ही खेळी खेळल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादी मजबूत : राजकीय क्षेत्रात मागे
वैभव नायकवडी यांनी हुतात्मा संकुलाची जबाबदारी समर्थपणे पेलली आहे. परंतु राजकीय क्षेत्रात त्यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही. याला कारण म्हणजे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते माजी मंत्री जयंत पाटील यांच्याशीच त्यांचा संघर्ष सुरु आहे. जयंत पाटील यांचेच वर्चस्व असल्याने नायकवडी आमदारकीपर्यंत पोहोचू शकले नाहीत.

Web Title: Vaibhav Nayakvadi's State Exercise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.