पगार विलंबनाचा शिक्षकांना नाहक त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:25 IST2021-04-10T04:25:58+5:302021-04-10T04:25:58+5:30
जत : मुंबईसह राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार अद्याप झाले नाहीत. फेब्रुवारी पेड इन मार्चचे पगार तब्बल ...

पगार विलंबनाचा शिक्षकांना नाहक त्रास
जत : मुंबईसह राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार अद्याप झाले नाहीत. फेब्रुवारी पेड इन मार्चचे पगार तब्बल एक महिन्याने मिळाले होते. तर मार्च पेड इन एप्रिलचे पगार दुसरा आठवडा संपत्ती आला तरी अद्याप झाले नाहीत. शिक्षण विभागातील दिरंगाईमुळे असे घडत असल्याचे वित्त विभागाकडून सांगण्यात येत आहे.
कोविडमुळे निधी वितरण दर महिन्याला मागणीनुसार होत आहे. पगाराची सर्व रक्कम खात्याने वेळीच मागितली पाहिजे. मात्र शिक्षण विभागाकडून असे होताना दिसत नाही. परिणामी त्याचा भुर्दंड शिक्षकांना सहन करावा लागत आहे, अशी तक्रार शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे व जत तालुका अध्यक्ष दिगंबर सावंत यांनी केली आहे.
पगार उशिरा झाल्यामुळे गृहकर्जाचे हफ्ते, इतर हफ्ते आणि दैनंदिन खर्च भागवणे शिक्षकांना मुश्किल होत आहे. हफ्ते चुकल्यामुळे व उशिरा भरल्यानंतर त्यांना दंडाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
मुंबईतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार युनियन बँकेतून करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अमंलबजावणी अद्यापही झालेली नाही. दोन वर्ष होऊनही करारनामा पुनर्स्थापित करण्यात आलेला नाही. त्यामुळे युनियन बँक व्यवस्थापनाला पगार वितरणामध्ये अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
चौकट
शिक्षणमंत्र्यांना पत्र
याबाबत आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड पत्र पाठवले आहे. शिक्षण विभागाचे सचिवालय राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्माचाऱ्यांच्या पगाराबाबत गंभीर नसल्यामुळेच दर महिन्याला पगार उशिरा होत आहेत, असा आरोप आमदार कपिल पाटील यांनी पत्रात केला आहे.