अथणी : कर्नाटकातील कागवाड-विजापूर राज्य मार्गावर मुरगुंडी गावाजवळ बनजवाड पीयू कॉलेजजवळ गुरुवारी मध्यरात्री जोरदार पावसात चिरा घेऊन जाणारा ट्रक आणि उसाचे बियाणे भरून जाणारी पिकअप यांच्यात धडक होऊन दोघेजण ठार झाले.अपघातानंतर बचाव करण्यास गेलेल्या एकास मोटारीने ठोकरल्याने तो देखील ठार झाला. शुभम युवराज चव्हाण (वय २४, रा. कुटवाड, ता. शिरोळ), महेश सुभाष गाताडे (वय ३०, रा. गणेशवाडी, ता. शिरोळ) आणि सचिन विलास माळी (वय ४२, रा. कवलापूर, ता. मिरज) अशी मृतांची नावे आहेत.घटनास्थळी मिळालेली माहिती अशी, रत्नागिरी येथे चिरा भरलेला ट्रक (केए २८ एए ५३८१) हा गुरुवारी रात्रीच्या सुमारास विजापूरकडे निघाला होता. त्याचवेळी अथणी येथून उसाची रोपे भरलेली पिकअप जीप (एमएच १० सीआर ९८७७) कागवाडकडे जात होती. भरपूर पाऊस सुरू असल्यामुळे समाेरील वाहने दिसण्यास अडथळा येत होता.चिरा भरलेल्या ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिली. चौदा चाकांच्या अवजड ट्रकने पिकअपला धडक दिल्यानंतर दोन्ही वाहने उलटली. यामध्ये पिकअपमधील शुभम चव्हाण आणि महेश गाताडे हे दोघेजण गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले.यावेळी मिरज तालुक्यातील कवलापूर येथील सचिन माळी हे चौघांना घेऊन कुणाळा (ता. अथणी) येथे नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी मोटार (एमएच ११ वाय ६०५०) मधून जात होते. वाटेत अपघात झाल्याचे पाहून मदतकार्यासाठी माळी खाली उतरले. त्याचवेळी अथणीहून कागवाडकडे जाणारी मोटार (केए २२ एमसी ९२५१) ने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर मोटार अंगावरून गेल्याने ते जागीच ठार झाले. अपघातानंतर माळी यांचे नातेवाईक मोटारीतून गडबडीत खाली उतरताना अंधारात खाली पडून किरकोळ जखमी झाले.
अपघातानंतर अथणीचे उपनिरीक्षक मल्लिकार्जुन उपार आणि पोलिस पथक घटनास्थळी धावले. पाऊस जोरदार सुरू असल्यामुळे रस्त्यावर नियंत्रण ठेवून पंचनामा करताना कसरत करावी लागली. यावेळी रस्त्यावर वाहनांची कोंडी झाली होती. मृतदेह बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले. शुक्रवारी सकाळी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मदतीला गेला अन् जीव गमावलाकागवाड-विजापूर रस्त्यावर दोन वाहनांचा अपघात झाल्यानंतर मदतीसाठी म्हणून सचिन माळी (रा. कवलापूर) हे मोटारीतून खाली उतरले. परंतु त्याचवेळी भरधाव वाहनाने त्यांना धडक दिल्यामुळे ते ठार झाले. माळी यांचा गाड्या भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी समजताच कवलापूर येथे शोककळा पसरली होती.