दिघंचीजवळ अपघातात दोन ठार
By Admin | Updated: May 3, 2015 00:57 IST2015-05-03T00:56:55+5:302015-05-03T00:57:26+5:30
आठजण गंभीर : खासगी बसची ट्रॅक्टरला धडक

दिघंचीजवळ अपघातात दोन ठार
दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) गावाच्या पश्चिमेस तीन किलोमीटरवर मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावरील पळसखेल फाट्याजवळ ट्रॅक्टर ट्रॉलीवर खासगी आराम बस आदळल्याने दोघे ठार, तर आठजण गंभीर जखमी झाले. अर्जुन राधाकृष्ण लाड (वय ३०, रा. परतवाडी (तोडा), ता. परतूर, जि. जालना) व हिराबार्ई चंद्रकांत पळसे (४०, वाठार, ता. फलटण, जि. सातारा) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना शनिवारी सकाळी आठ वाजता घडली.
मल्हारपेठ-पंढरपूर रस्त्यावर सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान, मुंबईहून दिघंचीकडे भरधाव वेगाने प्रवासी आराम बस (एमएच -०४ जी ७८७५) येत होती, तर माणगंगा कारखान्याचा ऊस आणण्यासाठी दिघंची येथील धनंजय महाडिक यांच्या मालकीचा ट्रॅक्टर (एमएच १० एवाय ५०९) दिघंचीहून पुसेसावळी येथे चालला होता. ट्रॅक्टर चालकाने समोरून भरधाव वेगाने बस येत असल्याचे पाहून ट्रॅक्टर रस्त्यावरून खाली घेतला. मात्र, बसचालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर आराम बस आदळली. या अपघातात ट्रॉलीमधील ऊसतोड कामगार अर्जुन लाड जागीच ठार झाला, तर त्याची पत्नी ट्रॉलीमधून रस्त्यावर आदळल्याने जखमी झाली. बसमधील नऊजण गंभीर जखमी झाले. त्यातील हिराबार्ई पळसे या महिलेचा उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. जखमींमध्ये कुमार बापूराव दालपे (३५), विजय रमेश पिसे (१४), संगीता औदुंबर पिसे (३०), आशाबाई रमेश पिसे (३०), नंदकुमार कोंडीबा पिसे (३३, सर्व रा. पिसेवाडी, ता. आटपाडी), शोभा सुभाष गायकवाड (२१, रा. पिंपरी, पुणे), तृप्ती राजू पळसे (८, पळशी), योगिता अर्जुन लाड (२५, परतूर तोडा-जालना) यांचा समावेश आहे.
बसची धडक एवढी जोरदार होती की, चालकाच्या बाजूचा पत्रा पूर्ण फाटल्याने आतील प्रवासी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. खासगी वाहनांमधून जखमींना आटपाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच आटपाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सदाशिव शेलार पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले, तर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. सावंत यांनी जखमींना तातडीने आटपाडी येथे हलविले.(वार्ताहर)