बारा ग्रामपंचायती अजूनही अंधारातच
By Admin | Updated: May 24, 2016 00:49 IST2016-05-23T23:20:28+5:302016-05-24T00:49:24+5:30
प्रशासनाचेही दुर्लक्ष : डिजिटल इंडियाच्या स्वप्नाला ब्रेक

बारा ग्रामपंचायती अजूनही अंधारातच
रत्नागिरी : एकीकडे खेडी इंटरनेटने जोडली जात असतानाच दुसरीकडे ग्रामीण भागाच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्ह्यातील १२ ग्रामपंचायती अंधारात आहेत. कारण स्वातंत्र्यानंतरही या ग्रामपंचायतींमध्ये अजूनही वीजजोडणी झालेली नाही़
आता खेडोपाडी मोबाईल, संगणकाच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर होत आहे़ त्याचबरोबर ग्रामपंचायतीही इंटरनेटने जोडल्यामुळे एका क्लिकवर कोणतीही माहिती काही सेकंदात उपलब्ध होते़ जग एवढे पुढे गेलेले असताना जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये वीज पुरवठा जोडलेला नाही़
विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना कोट्यवधी रुपये शासनाकडून दिले जातात़ त्यातून अनेक ग्रामीण भागाचा विकास साधला जातो़ आता ग्रामपंचायतींमध्ये विविध योजना राबविल्या जात असताना प्रत्येक ग्रामपंचायतींचे संगणकीकरण करण्यात येत आहे़ कारण विविध प्रकारचे दाखले ग्रामपंचायतींच्या माध्यमातून देण्यात येत आहेत़ त्याचबरोबर विवाह नोंदणीही ग्रामपंचायतींमध्येच करण्यात येत आहे. अशा प्रकारे ग्रामपंचायत ही गावच्या विकासाचा केंद्रबिंदू ठरलेली असतानाच जिल्ह्यातील १२ ग्रामपंचायतींमध्ये अद्यापही वीज जोडणी नाही़
या ग्रामपंचायतीेंच्या माध्यमातून विविध विकास कामे राबविली जात आहेत़ मात्र, ग्रामपंचायतींमध्ये वीज नसल्याने पावसाळ्याच्या दिवसांत सरपंच, ग्रामसेवक यांना अनेकदा आंधारामध्ये काम करावे लागते़ त्यामुळे एकीकडे संगणक युग सुरु असतानाच जिल्ह्यातील ग्रामपंचायती अजूनही वीजेपासून दूर आहेत. त्यामुळे या संगणक युगात या ग्रामपंचायतीमध्ये वीज नसल्याने संबंधित विभागाचा विकास कसा साधणार, असा प्रश्न उपस्थित आता ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)
1विकासकामांवर परिणाम : मागणी करूनही कानाडोळा
ग्रामपंचायतींकडून करण्यात येणाऱ्या विकासकामांची ई-निविदा काढण्यात येते. त्यानंतरच ही विकासकामे मार्गी लावण्यात येतात. काही ग्रामपंचायती विजेविना असल्याने त्यामध्ये संगणकांचा वापर कसा करणार, इंटरनेट सेवा नसल्याने त्याचा विकासकामांवरही परिणाम होत आहे. संगणक सेवा उपलब्ध झाली असली तरीही वीज नसल्याने अडचण झाली आहे.