पालकमंत्र्यांच्या आवाहनानंतर व्यापाऱ्यांचे आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:23 IST2021-04-12T04:23:50+5:302021-04-12T04:23:50+5:30
सांगली : पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यापाऱ्यांना आंदोलन न करण्याचे आवाहन केल्यानंतर त्यास प्रतिसाद देत सांगलीतील व्यापारी एकता असाेसिएशनने ...

पालकमंत्र्यांच्या आवाहनानंतर व्यापाऱ्यांचे आंदोलन मागे
सांगली : पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यापाऱ्यांना आंदोलन न करण्याचे आवाहन केल्यानंतर त्यास प्रतिसाद देत सांगलीतील व्यापारी एकता असाेसिएशनने सोमवारपासून दुकान उघडण्याचे पुकारलेले आंदोलन मागे घेतले. जिल्हा पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम यांनीही याप्रश्नी व्यापाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली व प्रतिसाद देण्याचे आवाहन केले.
व्यापारी एकता असोसिएशनने पाच दिवसांच्या निर्बंधास विरोध दर्शविला होता. हे निर्बंध मागे न घेतल्यास व्यापारी सोमवारी १२ एप्रिलपासून दुकाने उघडतील, असा इशारा दिला होता. सांगली जिल्ह्यासह राज्यभर कोरोनाचा संसर्ग वाढल्याने कडक लॉकडाऊनचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा व पालकमंत्री जयंत पाटील यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली. जयंत पाटील म्हणाले की, व्यापाऱ्यांचे लॉकडाऊनमुळे नुकसान होत असल्याची कल्पना असून, कोरोनाशी लढण्याकामी व्यापाऱ्यांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. कोरोनाचा संसर्ग गतीने वाढत असून, परिस्थिती कठीण बनली आहे. त्यामुळे त्यांनी शासनाच्या निर्णयांना बळ द्यावे, असे आवाहन केले.
यावर समीर शहा यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे स्पष्ट केले, मात्र शासनानेही व्यापाऱ्यांच्या नुकसानीबाबत विचार करावा व त्यांना साथ द्यावी, असे आवाहन केले. व्यापाऱ्यांमध्ये अजूनही होणाऱ्या नुकसानीमुळे चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना मदतीची भूमिकाही शासनाने घ्यावी, अशी मागणी केली. पालकमंत्र्यांनी याबाबत शक्य तो सकारात्मक विचार होईल, असे स्पष्ट केले.
पोलीसप्रमुख गेडाम यांनीही शहा यांच्याशी चर्चा करून आंदोलन न करण्याविषयी आवाहन केले. सर्वांच्याच आरोग्याचा हा प्रश्न असल्याने व पोलिसांवर वाढता ताण असल्याने व्यापाऱ्यांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन केले.