मिरज : वड्डी (ता. मिरज) येथील राजीव गांधीनगर येथे सुलोचना संजय म्हेत्रे (वय ४४ ) या भाजीपाला विक्रेत्या महिलेने सावकारांच्या त्रासाला कंटाळून घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची चिठ्ठी मृत महिलेजवळ सापडली. याबाबत नातेवाइकांनी मिरज ग्रामीण पोलिसांत खासगी सावकारांविरोधात तक्रार दिली आहे.सुलोचना म्हेत्रे या भाजीपाला विक्री व्यवसाय करीत होत्या. यासाठी त्यानी गावांतील तीन लोकांकडून व्याजाने ६० हजार रुपये रक्कम घेतली होती. त्यांनी व्याजासह पैसे परत केले होते. मात्र आणखी पैशाच्या मागणीसाठी त्यांना तगादा लावला होता. बुधवारी सकाळी काही खासगी सावकारांनी त्यांच्या घरात जाऊन त्यांना दम दिला होता.त्यानंतर सकाळी अकरा वाजता त्यांनी घरात पत्र्याच्या अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी रकमेसाठी तगादा लावणाऱ्या तिघांची नावे चिठ्ठीत लिहिली आहेत. ही चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. सुलोचना म्हेत्रे यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या खासगी सावकारांवर कारवाई करून म्हेत्रे कुटुंबाला न्याय देण्याची मागणी माजी नगरसेवक संजय मेंढे यांनी केली.
Sangli: खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून महिलेने संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:55 IST