खंडणीसाठी ठार मारण्याची धमकी
By Admin | Updated: June 26, 2014 00:27 IST2014-06-26T00:18:48+5:302014-06-26T00:27:03+5:30
सव्वा कोटीची मागणी : फिर्यादीच्या साडूचे अपहरण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

खंडणीसाठी ठार मारण्याची धमकी
तासगाव : विविध विमा कंपनीचे मालक राजेंद्रकुमार परशुराम जाधव (रा. तासगाव) यांच्याकडे सव्वा कोटी रुपये खंडणीची मागणी करून ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना आज, बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. खंडणीसाठी जाधव यांचे साडू उदय राजाराम थोरात (रा. सांगलीवाडी) यांचे अपहरण केले होते, अशी फिर्याद जाधव यांनी दिली. याप्रकरणी नितीन राजाराम चौगुले (रा. ढवळी, ता. वाळवा) व राजेंद्र होनमोरे (रा. लक्ष्मीनगर, सांगली) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. १५ मे ते ३१ मेदरम्यान ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
नितीन चौगुले याने आष्टा येथे व्यायामशाळा बांधली आहे. ती पाहण्यासाठी यावे, म्हणून त्याने जाधव यांना आग्रह केला. त्यानुसार ते दि. १५ मे रोजी रात्री व्यायामशाळा पाहण्यासाठी गेले होते. चहा घेण्याच्या निमित्ताने ते तेथून गाडीत बसून बाहेर पडले. तेव्हा चौगुलेने गाडी इस्लामपूरच्या दिशेला नेऊन एका शेतात थांबवली. तेथे अनोळखी पाचजण आधीच आले होते. त्यांनी, ‘आता सव्वा कोटी रुपये द्या, नाही तर ठार मारतो व आष्टा येथील प्लॉट नावावर करून द्या,’ असा दम दिला. त्यावेळी जाधव यांनी त्यांना समजावून सांगून सुटका करून घेतली व ते कोल्हापूरला गेले. दि. ३१ रोजी जाधव त्यांच्या येथील बेंद्री रस्त्यावरील शेतात गेले होते. दुपारी साडेबाराच्या दरम्यान त्यांचे साडू उदय राजाराम थोरात त्यांना भेटून तासगावातील घरी गेले. दुपारी दीडच्या दरम्यान थोरात यांचा जाधव यांना मोबाईलवर फोन आला. चौगुले व होनमोरे यांनी घरी येऊन आपल्याला आष्टा येथे जबरदस्तीने नेल्याचे त्यांनी जाधव यांना सांगितले. त्यांना मारहाणही करण्यात आली.
जाधव यांनी सव्वा कोटी रुपये आणून दिल्याशिवाय सुटका नाही, असे सांगत त्यांनी थोरात यांना दूरध्वनी करायला लावला.
त्यावर जाधव यांनी तातडीने भाऊ दीपक व पुतण्या नितीन यांना घडलेला प्रकार सांगितला. थोरात यांना सोडविण्यासाठी दीपक व नितीन यांना आष्टा येथे पाठविले, तेव्हा पैसे दिल्याशिवाय सोडणार नाही, असे त्यांना सांगण्यात आले. भाऊ दीपक यांचा राजेंद्रकुमार जाधव यांना मोबाईलवर दूरध्वनी आला. पैसे दिल्याशिवाय सोडायला तयार नाहीत, असे त्यांनी जाधव यांना सांगितले. तेवढ्यात मोबाईलचा स्पीकर सुरू करून, तत्काळ पैसे घेऊन ये, असा दम चौगुले व होनमोरे यांनी जाधव यांना दिला. याबाबत आपण उद्या भेटू,आता त्यांना सोडून द्या, असे जाधव यांनी समजावून सांगितले. काही वेळानंतर पुन्हा त्यांना मोबाईलवर फोन करून, आता सोडतो, पण उद्या पैसे मिळाले पाहिजेत, नाही तर घरच्यांना उचलून नेईन व एचआयव्हीचे इंजेक्शन देऊन हालहाल करून मारीन, असा दम दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर दीड तासाने पुतण्या नितीन व साडू उदय घरी आले, तेव्हा ते घाबरलेले होते. दुसऱ्यादिवशी नितीन चौगुले व त्याचा भाऊ अभिजित चौगुले हे दोघे जाधव यांच्या कोल्हापुरातील कार्यालयात गेले व तेथील कर्मचाऱ्यांना उद्यापासून यायचे नाही असा दम दिला. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संशयितांना समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी ऐकले नाही. या प्रकाराने मानसिक स्थिती बिघडल्याने जाधव यांनी आज फिर्याद दिली. (वार्ताहर)