वाहनाचा दंड न भरणाऱ्यांवर थेट खटला दाखल होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:27 IST2021-09-19T04:27:04+5:302021-09-19T04:27:04+5:30
सांगली : वाहतूक नियमांचा भंग केल्याबद्दल वाहतूक शाखेच्यावतीने करण्यात आलेला दंड न भरल्यास आता कडक कारवाई होणार आहे. पोलीस ...

वाहनाचा दंड न भरणाऱ्यांवर थेट खटला दाखल होणार
सांगली : वाहतूक नियमांचा भंग केल्याबद्दल वाहतूक शाखेच्यावतीने करण्यात आलेला दंड न भरल्यास आता कडक कारवाई होणार आहे. पोलीस दलाने ई-चलनाचा दंड भरण्यासाठी विशेष मोहीम आयोजित केली असून त्यानंतरही दंड न भरल्यास त्या वाहनचालकांवर थेट न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ई चलन डिव्हाईस मशिनव्दारे पेड व अनपेड अशा दोन्ही स्वरूपात दंडात्मक कारवाई करण्यात येते. सध्या मात्र, अनेक वाहनचालकांकडून हा दंड भरण्यात आलेला नाही. ज्या वाहनचालकांचे दंड प्रलंबित आहेत त्यांना आता संदेश मिळणार आहे. त्यांनी २१ ते २४ सप्टेंबर कालावधीत जिल्ह्यातील सर्व वाहतूक शाखा कार्यालयात जाऊन दंड भरावा. यासाठी सांगली, मिरज, विटा, तासगाव आणि इस्लामपूर येथील वाहतूक शाखा कार्यालयात दंड भरण्यासाठी नियोजन केले आहे. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या आदेशानुसार कारवाई होणार आहे. तसेच जे वाहनचालक दंड भरणार नाहीत त्यांच्यावर न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार आहे. खटल्याचा निकालही लोक अदालतीमध्ये होणार आहे. तरी वाहनधारकांनी दंडाची रक्कम भरावी असे आवाहन नोडल अधिकारी तथा सहायक निरीक्षक प्रज्ञा देशमुख यांनी केले आहे.
चौकट
जिल्ह्यात ८ हजार ५५४ केसेसचा ५१ लाख ७४ हजार ३०० रुपयांचा दंड प्रलंबित आहे. या दंडाच्या वसुलीसाठी आता पोलिसांनी वाहतूक शाखानिहाय नियोजन केले आहे.