मिरज शहरात चोरट्यांचा धुमाकूळ

By Admin | Updated: June 14, 2015 00:03 IST2015-06-14T00:03:51+5:302015-06-14T00:03:51+5:30

पोलीस यंत्रणेला आव्हान : एकाच दिवसात चोरीच्या चार घटनांनी खळबळ

Thieves in Miraj city | मिरज शहरात चोरट्यांचा धुमाकूळ

मिरज शहरात चोरट्यांचा धुमाकूळ

मिरज : मिरजेत चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून एकाचदिवशी चार वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्यांचे प्रकार घडले. दोन ठिकाणी घरफोड्या करून सुमारे ८० हजार किमतीचे दागिने लंपास करण्यात आले. आठवडा बाजारात मोबाईल चोरण्यात आला. तसेच ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारातून वाळूचा ट्रक पळवून नेण्यात आला.
सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी टाकळी रस्त्यावरील म्हेत्रे मळ्यात महिलांचे ५० हजार किमतीचे दागिने लंपास केले. राजू जोतिराम मंडले यांचे कुटुंबीय झोपेत असताना घराच्या दरवाजाची कडी काढून चोरटे आत शिरले. चोरट्यांनी घरात झोपलेल्या मंडले कुटुंबातील दोन महिलांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे गंठण व अर्धा तोळ्याचे मंगळसूत्र ब्लेडने कापून घेतले. दागिने काढून घेताना एका महिलेस जाग आल्यानंतर तिने आरडाओरडा केल्याने चोरट्यांनी पलायन केले. याप्रकरणी राजू मंडले यांनी शहर पोलिसात तक्रार दिली आहे.
गंगानगर येथेही असाच प्रकार घडला. घराचे बांधकाम सुरू असल्याने विनायक नाईक कुटुंबीय पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्यास आहेत. अज्ञात चोरट्यांनी रात्री शेडच्या दरवाजाची कडी काढून आत प्रवेश केला व रेणुका विनायक नाईक यांचे एक तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, दोन हजार रोख रक्कम व मोबाईल असा ऐवज असलेली पर्स लंपास करण्यात आली. आज सकाळी जाग आल्यानंतर नाईक यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. रेल्वे स्थानकालगत असलेल्या गंगानगर परिसरात चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. येथे वारंवार घरफोड्या व चोऱ्यांमुळे नागरिक हैराण आहेत.
शहरातील आठवडा बाजारात मोबाईल व महिलांच्या दागिन्यांच्या चोऱ्या सुरूच आहेत. मंगळवार पेठ आठवडा बाजारात प्रकाश आनंदा माळी (रा. हडको कॉलनी मिरज) हे भाजी खरेदीसाठी आले असताना, त्यांचा २८ हजार रूपये किमतीचा मोबाईल चोरीला गेला. चोऱ्यांच्या घटनांमुळे आठवडा बाजारात गस्त घालणारे पोलीस कर्मचारी सोमनाथ गुंडे व सचिन झाडगे यांनी एका मुलास संशयावरून हटकले असता, त्याच्याकडे चोरीचा मोबाईल सापडला.
विनापरवाना वाळू वाहतूक करताना पकडण्यात आलेला ट्रक मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारातून पळवून नेण्यात आला. याप्रकरणी ट्रकमालकाविरूध्द शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वाळू ट्रक पळवून नेण्याची ही तिसरी घटना आहे.
दि. ४ रोजी मिरज-पंढरपूर रस्त्यावर विनापरवाना वाळू वाहतूक करणारा (एमएच १४ सीयू. ००३४) क्रमांकाचा ट्रक महसूल विभागाच्या पथकाने पकडला होता. सहा ब्रास वाळूसह ट्रक ताब्यात घेऊन ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात उभा करण्यात आला होता. दि. ८ रोजी रात्रीच्या वेळी ट्रक पळवून नेला.
याप्रकरणी मंडल अधिकाऱ्यांनी ट्रक मालक दत्तात्रय शहाजी गायकवाड (रा. ओझेवाडी, ता. पंढरपूर) याच्याविरूध्द गौणखनिज चोरीची फिर्याद दिली आहे. (वार्ताहर)
 

Web Title: Thieves in Miraj city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.