जत तालुक्यामधील दहा तलाव कोरडे

By Admin | Updated: August 26, 2015 23:12 IST2015-08-26T23:12:00+5:302015-08-26T23:12:00+5:30

भूजल पातळी घटली : केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक; टॅँकर भरण्यासाठीही पाणी नाही

Ten lakes dry in Jat taluka | जत तालुक्यामधील दहा तलाव कोरडे

जत तालुक्यामधील दहा तलाव कोरडे

गजानन पाटील - संखउन्हाची वाढती तीव्रता, मान्सून पावसाने दिलेली दडी, अवाजवी पाणी उपसा यामुळे कायम दुष्काळग्रस्त जत तालुक्यातील पाणीपातळीत कमालीची घट झाली आहे. पाण्याअभावी विहिरी, कूपनलिका, तलाव कोरडे पडू लागले आहेत. २६ तलावांपैकी १० तलाव कोरडे व १० तलावातील पाणीपातळी मृतसंचयाखाली गेली आहे.
तालुक्यातील भूजल पातळी ७०० ते ८०० फुटांपर्यंत खाली गेली आहे. डाळिंब, द्राक्षे, फळबागांच्या पाण्यासाठी शेतकरी कूपनलिका, विहिरींची खुदाई करू लागला आहे. तलावामध्ये १० ते १२ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. निम्मा पावसाळा संपत आला तरी पावसाचा पत्ता नसल्याने दुष्काळाची गडद छाया निर्माण झाली आहे. सध्या महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. पाण्याचा उद्भव साठा संपत आल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.
दुष्काळ हा तालुक्याच्या पाचवीला पूजलेला आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून पाऊसच झाला नसल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. तालुक्यामध्ये सरासरी पर्जन्यमान ५२० मि. मी. इतके आहे. आजअखेर पक्त ८० ते ८५ मि. मी. इतका पाऊस झाला आहे. पूर्व भागातील संख, दरीबडची परिसरात अत्यल्प पाऊस झाला आहे. खरिपाची पेरणीच झाली नाही. जमिनीखालील पाण्याची पातळी विक्रमी प्रथमच ७०० ते ८०० फुटांपर्यंत गेली आहे. पाण्याअभावी द्राक्षे, डाळिंब, फळबागा धोक्यात आल्या आहेत. विहिरी, तलाव, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. रानामध्ये खुरट्या गवताची उगवण झाली नसल्याने पाण्यासह चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. मेंढपाळ शेळ्या, मेंढ्या घेऊन कऱ्हाड, सातारा, कर्नाटकातील काळ्या रानाच्या भागात व नदीकाठच्या परिसरात स्थलांतरित झाले आहेत. यावेळी प्रथमच या भागातून मेंढपाळांना स्थलांतरित व्हावे लागत आहे. दरवर्षी कोल्हापूर भागातील मेंढपाळ येथे येतात. यावर्षी रानात गवत नसल्याने मेंढपाळ आले नाहीत.
शेतकऱ्यांनी द्राक्षे, डाळिंब, फळबागा घेतल्या आहेत. द्राक्षबागांच्या काड्या तयार करण्याचे काम सुरू आहे. सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यामध्ये छाटणी केली जाणार आहे. डाळिंब, फळबागांना मे महिन्यात पाणी सोडले आहे. फळधारणा झालेली आहे. सध्या डाळिंबाची फळे सुपारी, पेरूच्या आकाराची झाली आहेत. फळबागांना पाण्याची नितांत गरज आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांनी रासायनिक खते, औषधावर मोठ्या प्रमाणात खर्च केलेला आहे. बागा वाचविण्यासाठी विहीर, कूपनलिका खुदाई शेतकरी करू लागला आहे. तसेच खरीप हंगामाची फक्त २९ टक्केच पेरणी झालेली आहे. झालेल्या पेरणीतील पिकेही पावसाअभावी वाळून गेली आहेत.
निम्मा पावसाळा झाला तरी सुद्धा दमदार पाऊस न पडल्यामुळे तालुक्यातील २६ तलावांपैकी १० तलाव कोरडे असून, १० तलावांतील पाणी पातळी मृतसंचयाखाली गेली आहे. सहा तलावांमध्ये फक्त १२ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. मिरवाड, डफळापूर, बिळूर, दरीबडची, उमराणी, बेळोंडगी, खोजानवाडी, गुगवाड, तिकोंडी -१, तिकोंडी- २ हे तलाव कोरडे पडलेआहेत. तसेच संख मध्यम प्रकल्प व दोड्डानाला मध्यम प्रकल्पामध्ये पाणीसाठा मृतसंचयाखाली आला आहे.


दरीबडची साठवण तलाव कोरडा
दरीबडची परिसरामध्ये गेल्या ५ वर्षापासून पाऊस कमी झाल्यामुळे साठवण तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे. तलाव बांधल्यापासून २००९ मध्ये पूर्ण क्षमतेने भरला होता. त्यानंतर हा साठवण तलाव भरलाच नाही. या तलावात ४ कि.मी. अंतरावरून पाणी येते. उद्भव साठ्यात वाटेत बंधारे, पाझर तलाव आहेत. ते भरून पाणी द्यावे लागते.
टॅँकरची वाढती संख्या
तालुक्यातील २५ गावे आणि त्याखालील २१८ वाड्या-वस्त्यांवर २९ टॅँकरद्वारे ७७ हजार १३० नागरिकांना प्रतिदिन ३४ लाख ८ हजार लिटर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मोरबगी, घोलेश्वर, सोनलगी, आवंढी, लोहगाव, बालगाव या गावातही पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांनी टॅँकरची मागणी केली आहे. सप्टेंबर २०१५ अखेरपर्यंत तालुक्यात ४५ टॅँकर सुरू करावे लागणार आहेत. यामुळे प्रशासनाच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.

Web Title: Ten lakes dry in Jat taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.