तासगाव नगरपालिका विरोधक बेभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:41 IST2021-02-23T04:41:19+5:302021-02-23T04:41:19+5:30
तासगाव : नगरपालिकेतील चार वर्षांचा कारभार नागरिकांतून रोष निर्माण करणारा ठरला आहे. सत्ताधाऱ्यांकडून होत असलेल्या मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्यात ...

तासगाव नगरपालिका विरोधक बेभरोसे
तासगाव : नगरपालिकेतील चार वर्षांचा कारभार नागरिकांतून रोष निर्माण करणारा ठरला आहे. सत्ताधाऱ्यांकडून होत असलेल्या मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्यात विरोधी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना अपयश आले. त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांच्या रोषाला सामोरे कोण आणि कोणते मुद्दे घेऊन जायचे, असा प्रश्न नेत्यांसमोर आहे. पालिकेतील राष्ट्रवादीचा विरोध बेभरोशाचाच राहिला आहे, तर सत्ताधाऱ्यांची कामगिरी खासदारांच्या भरोशावर सुरू असल्याचे चित्र आहे.
तासगाव नगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर मिळालेल्या कोट्यवधी रुपयांतून स्वत:चे कोटकल्याण करण्यातच सत्ताधारी कारभारी मश्गूल राहिले. प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यापेक्षा पालिकेत निघणारे टेंडर आणि ठेकेदार यावरच बहुतांश नगरसेवकांचा वॉच राहिला. ठेका आणि टक्का यापलीकडे पालिकेत काही कामकाज असते का, असा प्रश्न उपस्थित व्हावा, असाच कारभार गेल्या चार वर्षांत सुरू आहे. सामान्य जनतेच्या कामांची सर्व भिस्त प्रशासनावर ठेवून मिळालेला निधी खर्ची टाकण्याच्या नियोजनातच सत्ताधारी मश्गूल राहिले.
सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभारावर वास्तविक राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून अंकुश ठेवला असता तर राष्ट्रवादीला नागरिकांच्या मनात स्थान मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण करता आली असती. यापूर्वीच्या सभागृहात एक, दोन संख्याबळ असूनही सदस्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करून बेकायदा कामे हाणून पाडल्याचा इतिहास आहे. मात्र यावेळच्या सभागृहात आठ नगरसेवक असूनदेखील राष्ट्रवादीची कामगिरी प्रभावशून्य राहिली आहे.
हंगामी विरोध करणाऱ्या राष्ट्रवादीचा कारभार बेभरोशाचाच राहिला, तर सत्ताधाऱ्यांकडून स्वत:चे कोटकल्याण करण्याच्या प्रवृत्तीमुळे पालिकेचा विकास खासदारांच्या भरोशावरच सुरू आहे.
चौकट
राष्ट्रवादीचा कारभार हंगामी
तासगाव नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा कारभार बेभरवशाचा राहिला असून, त्यांची कामगिरी हंगामीच राहिली आहे. राष्ट्रवादीचे एक, दोन नगरसेवक सर्वसाधारण सभा आणि एखाद्या ठेक्याच्या विषयावर मोजका आक्षेप सोडला तर पुन्हा दिसून येत नाहीत. बाकीचे नगरसेवक केवळ सह्याजीराव आहेत, तर काही महिला नगरसेविकांच्या पतीच्याच पालिकेत उचापती असल्याचेही दिसून आले आहे. राष्ट्रवादीच्या हंगामी विरोधामुळे भाजपच्या कारभाऱ्यांचाही कारभार निरंकुश राहिला आहे.