भाजीपाल्यात स्वताई; किराणा सामानात महागाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:24 IST2021-03-08T04:24:39+5:302021-03-08T04:24:39+5:30

सांगली : उन्हाळ्याची चाहूल बाजारपेठेला लागल्याने काही भाज्यांची उपलब्धता कमी होत आहे तर लिंबू, कलिंगड, टरबूज, काकडीला मागणी वाढत ...

Swatai in vegetables; Inflation in groceries | भाजीपाल्यात स्वताई; किराणा सामानात महागाई

भाजीपाल्यात स्वताई; किराणा सामानात महागाई

सांगली : उन्हाळ्याची चाहूल बाजारपेठेला लागल्याने काही भाज्यांची उपलब्धता कमी होत आहे तर लिंबू, कलिंगड, टरबूज, काकडीला मागणी वाढत आहे. या आठवड्यात ग्राहकांना थोडा फार दिलासा मिळताना भाज्यांचे दर तुलनेने कमी झाले तर काहींचे स्थिर राहिले आहेत. किराणा सामानाच्या दरातील वाढ मात्र, कायमच राहिली. खाद्य तेलांचे दर वाढतानाच धान्याचेही दर वाढले आहेत.

गेल्या आठवड्यात सरासरी ६० रूपयांवर असलेल्या फळभाज्यांच्या दरात काहीशी घसरण जाणवली. मात्र, त्याचवेळी कांदा दरात वाढ झाली आहे. कांदा, लसूण आणि बटाटा दरात अजून वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. लसूण सध्या ८० ते १२० तर कांदा ४० ते ५० रूपये किलोने मिळत आहे.

चौकट

मिरचीच्या दरात वाढ

चटणीच्या मिरची दरात वाढ झाली आहे. कर्नाटक, तेलंगणाहून येणाऱ्या मिरच्यांची आवक काहीशी मंदावल्याने अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वर्षभर मागणी असलेल्या या मिरच्यांच्या दरात वाढ झाली आहे. स्थानिक पातळीवरील मिरची मात्र, वाजवी दरात उपलब्ध आहे.

चौकट

कलिंगड,चिकूची चलती

फळ बाजारात सध्या सर्वत्र कलिंगडाचे ढीग दिसून येत आहेत. शहरातील विविध भागातही कलिंगडाची विक्री सुरू असून दर कमी असल्याने ग्राहकही मिळत आहेत. याशिवाय अद्यापही चिकूची आवक वाढतच आहे.

चौकट

डाळींना दरवाढीचा तडका

किराणा सामानातील दरवाढ कायमच असल्याने ग्राहक नाराज असतानाच, डाळींचे दरही या आठवड्यात सरासरी ५ ते १० रूपयांनी वाढले आहेत. उन्हाळ्यात वर्षभरासाठी डाळी खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी मात्र, आता गरजेएवढीच खरेदी सुरू केली आहे.

कोट

भाजीपाला दर आवाक्यात आले आहेत हे समाधानकारक आहे मात्र, या आठवड्यात लिंबाच्या दरात वाढ झाली आहे. पालेभाज्यांचीही आवक कमी कमी होत आहे. स्थानिक माल सध्या चांगला उपलब्ध होत आहे.

सर्जेराव शिंदे, व्यापारी

कोट

भाजीपाला दर अजूनही कमी आहेत पण म्हणाव्या तशा भाज्या उपलब्ध होत नाहीत. डाळींचे दर वाढले आहेत. अजून किती दरवाढ होईल याची आता बघूनच खरेदी करावी लागणार आहे.

ऋतुजा पवार, गृहिणी

कोट

थंडी कमी होत आहे तशी फळांच्या आवकेवरही परिणाम होत आहे. सध्या आवक समाधानकारक आहे. यामुळे जिल्ह्यासह परिसरातून अद्यापही चांगली मागणी आहे. कलिंगडाची आवक अजूनही वाढेल.

नितीन गिड्डे, व्यापारी

Web Title: Swatai in vegetables; Inflation in groceries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.