शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ‘स्वाभिमानी’ रस्त्यावर उतरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:51 IST2021-03-04T04:51:39+5:302021-03-04T04:51:39+5:30
सांगली : वाढीव वीज बिले, पेट्रोल, डिझेल, ग्रॅस दरवाढ, उसाची एकरकमी एफआरपी यासह विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी ...

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ‘स्वाभिमानी’ रस्त्यावर उतरणार
सांगली : वाढीव वीज बिले, पेट्रोल, डिझेल, ग्रॅस दरवाढ, उसाची एकरकमी एफआरपी यासह विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार आहे. याबाबतचा निर्णय संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी येथे बुधवारी दिली.
येथे संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते.
जगताप म्हणाले की, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांसह शेतकरी संकटात सापडले आहेत. शासन वाढीव वीज बिले देऊन गळचेपी करीत आहे. साखर कारखानदार कायद्यानुसार एकरकमी एफआरपी द्यायला तयार नाहीत. द्राक्ष आणि भाजीपाल्याचे दर पाडले जात आहेत. पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर गगनाला भिडले आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना एकत्र करून स्वाभिमानी शेतकरी संघटना लवकरच रस्त्यावर उतरणार आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली संघटना बांधणीचे काम जोमाने करू.
महेश खराडे, जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, संदीप राजोबा, संजय बेले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भागवत जाधव, महेश जगताप, संजय खोलकुंबे, राजेंद्र माने, जगन्नाथ भोसले, राजेंद्र पाटील उपस्थित होते.
चौकट
वीज बिले भरू नका
स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, लॉकडाऊनची भीती दाखवून दलाल द्राक्षांचे दर पाडत आहेत. भूलथापांना बळी पडू नये. वीज बिले कोणीही भरू नयेत. वीज पुरवठा तोडण्यास कोणी आल्यास संघटनेशी संपर्क साधावा, आम्ही त्यांचा बंदोबस्त करू.