नेर्ले येथील बेपत्ता महिलेच्या खुनाचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:27 IST2021-04-11T04:27:01+5:302021-04-11T04:27:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : नेर्ले (ता. वाळवा) येथून ५ एप्रिल रोजी बेपत्ता झालेल्या ४६ वर्षीय महिलेचा खून झाल्याची ...

नेर्ले येथील बेपत्ता महिलेच्या खुनाचा संशय
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : नेर्ले (ता. वाळवा) येथून ५ एप्रिल रोजी बेपत्ता झालेल्या ४६ वर्षीय महिलेचा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तिच्या डोक्यात शस्त्राने मारून तिचा खून करण्यात आल्याचे उत्तरीय तपासणीतून निष्पन्न झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. अनैतिक संबंधाच्या कारणातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे.
मंगल पांडुरंग गुरव (४६, रा. नेर्ले) असे या महिलेचे नाव आहे.
ही महिला ५ एप्रिलला घरातून कोणास काही न सांगता बाहेर निघून गेली होती. तिचा शोध घेऊनही ती न सापडल्याने मुलगा अक्षय याने कासेगाव पोलिसात तिच्या बेपत्ता होण्याची वर्दी दिली होती.
दरम्यान शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास मंगल गुरव हिचा सडलेल्या अवस्थेमधील मृतदेह बहे हद्दीतील पेठ ओढ्याच्या वाहत्या पाण्यात मिळून आला. कासेगाव पोलिसात या महिलेच्या बेपत्ता होण्याची नोंद असल्याने तिची ओळख पटली. सायंकाळी तिच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. यावेळी तिच्या डोक्यात शस्त्राने मारल्याचा खुणा आढळून आल्याने तिचा खून झाल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी या महिलेच्या मोबाइल कॉल्सची माहिती मिळवली आहे. त्यावरून ती अनैतिक संबंधाच्या कारणातून घराबाहेर पडली असावी, अशी शक्यता गृहीत धरून त्या दिशेने पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली आहे.
कोट
ही घटना अनैतिक संबंधातून घडली असावी. आत्मघात की घातपात अशा दोन्ही बाजूंनी तपास सुरू आहे. लवकरच या गुन्ह्याची उकल करण्यात यश येईल. त्यानंतर रीतसर गुन्हा नोंद केला जाईल.
-नारायण देशमुख, पोलीस निरीक्षक