भारत बंदला जिल्ह्यातील संघटनांचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:28 IST2021-09-25T04:28:00+5:302021-09-25T04:28:00+5:30
सांगली : दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून संयुक्त किसान मोर्चातर्फे सोमवार दि. २७ सप्टेंबर रोजी भारत ...

भारत बंदला जिल्ह्यातील संघटनांचा पाठिंबा
सांगली : दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून संयुक्त किसान मोर्चातर्फे सोमवार दि. २७ सप्टेंबर रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे. या बंदला पाठिंबा म्हणून सांगली जिल्ह्यात धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात येणार आहेत. सांगलीतील पुरोगामी संघटना आणि शेतकरी संघटनांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सांगलीतील कष्टकऱ्यांची दौलत येथे शुक्रवारी सामाजिक संघटनांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस हमाल पंचायतचे नेते विकास मगदुम, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, ॲड. के. डी. शिंदे, कॉ. धनाजी गुरव, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख, कॉ. दिगंबर कांबळे, तुळशीराम गळवे, डॉ. संजय पाटील, कॉ. नंदकुमार हत्तीकर, सदाशिव मगदुम, अमृतराव सूर्यवंशी आदी उपस्थित होते. यावेळी क्रांती वीरांगना हौसाबाई पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
भारत बंदमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांचा मोठा सहभाग राहिला पाहिजे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तीन कृषी कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाबरोबरच, केंद्र सरकारने नवीन श्रमसंहिता आणली आहे. त्या कामगार कायद्याला देखील संयुक्त कृती समितीचा विरोध आहे. या आंदोलनास पाठिंबा म्हणून दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सांगलीतील स्टेशन चौकात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय झाला तसेच प्रत्येक तहसीलदार कार्यालयातही निदर्शने करुन धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उमेश देशमुख यांनी दिली.