खून प्रकरणातील सरपंचाच्या भाच्यावर जीवघेणा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:23 IST2021-03-07T04:23:52+5:302021-03-07T04:23:52+5:30
कवठेमहांकाळ : शहरातील जत रस्त्यावरील गजबजलेल्या थबडेवाडी चौकात अमर जयराम आटपाडकर (वय २८, रा. पिंपळवाडी) याच्यावर पूर्ववैमनस्यातून जीवघेणा ...

खून प्रकरणातील सरपंचाच्या भाच्यावर जीवघेणा हल्ला
कवठेमहांकाळ : शहरातील जत रस्त्यावरील गजबजलेल्या थबडेवाडी चौकात अमर जयराम आटपाडकर (वय २८, रा. पिंपळवाडी) याच्यावर पूर्ववैमनस्यातून जीवघेणा हल्ला झाला. हरोलीचे माजी सरपंच युवराज पाटील यांच्या खून प्रकरणातील संशयित रमेश खोत याचा तो भाचा आहे. ही घटना शनिवारी सकाळी साडेनऊला घडली. या जीवघेण्या हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. आटपाडकर गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर मिरजेत उपचार सुरू आहेत.
कवठेमहांकाळ पोलिसांनी हरोलीचे माजी सरपंच युवराज पाटील यांचा मुलगा मारुती ऊर्फ राष्ट्रपती युवराज पाटील, अनंत पारे यांना ताब्यात घेतले आहे. अद्याप दोघेजण फरार आहेत.
बोरगावमधील हाणामारी प्रकरणापाठोपाठ शनिवारी कवठेमहांकाळ तालुक्यात पुन्हा जीवघेण्या हल्ल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. अमर आटपाडकर पिंपळवाडीचा माजी सरपंच रमेश खोत याचा भाचा आहे. रमेश खोत हा हरोलीचे माजी सरपंच युवराज पाटील यांच्या खून प्रकरणातील संशयित आहे. सध्या तो मोक्काच्या कारवाईखाली कारागृहात आहे. अमर हा खोत याचा भाचा असल्याने युवराज पाटील यांच्या कार्यकर्त्यांचे त्याच्याशीही वैमनस्य आहे.
अमरचे येथील थबडेवाडी चौकात ऑनलाईन लॉटरीचे दुकान आहे. सकाळी ते उघडण्यासाठी तो आला होता. दुकान उघडण्याआधी तो शेजारील हॉटेलजवळ उभा होता. तेथे दुचाकीवरून चार अज्ञात हल्लेखोर आले. काही समजण्याच्या आतच त्यांनी हातातील कुकरीने अमरवर जीवघेणा हल्ला केला. त्याच्या डोक्यावर, पोटावर, छातीवर सपासप वार केले. झटापटीत अमर खाली पडला. तिथे असणारे हॉटेलमालक विजय माने यांनी हल्लेखोरांना अडवले. त्यानंतर तिथे शेजारचे दुकानदार पळत आले. त्यांना पाहून हल्लेखोर गाडी तिथेच टाकून पसार झाले. अमर याला मिरज येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी हरोलीचे माजी सरपंच युवराज पाटील यांचा मुलगा मारुती ऊर्फ राष्ट्रपती युवराज पाटील, अनंत पारे या दोघांना ताब्यात घेतले आहे. अद्याप दोघे फरार आहेत. या घटनेने कवठेमहांकाळ तालुका हादरला आहे.
चौकट
टोळीयुद्ध भडकणार
गेले वर्ष-दीड वर्ष शांत असणारा कवठेमहांकाळ तालुका पुन्हा सुडाच्या भावनेने पेटला आहे. तालुक्यात पुन्हा टोळीयुद्ध भडकणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या आठवड्यात बोरगावच्या हाणामारी प्रकरणानंतर लगेच हा हल्ला झाल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण आहे.