जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढले दहा हजार हेक्टरने
By Admin | Updated: July 30, 2015 00:27 IST2015-07-29T23:29:06+5:302015-07-30T00:27:54+5:30
गाळपाचे आव्हान : शेतकऱ्यांची साखर कारखानदारांकडून अडवणूक होण्याची चिन्हे; उत्पादक चिंतेत--लोकमत विशेष

जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढले दहा हजार हेक्टरने
अशोक डोंबाळे - सांगली -जिल्ह्यात २०१४-१५ यावर्षी ७४ हजार ४७९ हेक्टर उसाचे क्षेत्र होते. यामध्ये २०१५-१६ वर्षाच्या गळीत हंगामासाठी जाणाऱ्या उसाचे क्षेत्र दहा हजार हेक्टरने वाढून ८४ हजार ९६६ हेक्टर झाले आहे. ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनांचे पाणी दुष्काळी टप्प्यातील काही भागात फिरले आहे. या पाण्यावर शेतकऱ्यांनी अन्य पिके घेण्याऐवजी उसाचे पीक घेतल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. उसाच्या वाढत्या क्षेत्राचा विचार केल्यास, येत्या ऊस गळीत हंगामामध्ये जिल्ह्यातील कारखान्यांकडून वेळेवर ऊस गाळपास जाईल, याची खात्री देता येणार नाही. कारखानदारांकडून शेतकऱ्यांची अडवणूक होण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही.
कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या शेतकऱ्यांबरोबरच दुष्काळी भागातील शेतकरीही उसाकडेच वळल्याचे शासकीय आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे. दुष्काळी जत, कवठेमहांकाळ आणि मिरज पूर्व भागामध्ये म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी फिरले आहे. येथील शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची निवड करण्याची गरज होती. परंतु, पाणी उपलब्ध झाल्यामुळे तेथील शेतकरीही ऊस पिकाकडेच वळल्याचे दिसत आहे. जत तालुक्यातील उसाचे क्षेत्र ६०० हेक्टरवरून दुप्पट होऊन १२७४ हेक्टर झाले आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील २ हजार ६४९ हेक्टरवरून ३ हजार ८१० हेक्टर उसाचे क्षेत्र झाले आहे. आटपाडी, खानापूर तालुक्यात दुप्पट, तर कडेगाव तालुक्यात अडीच हजार हेक्टरने उसाचे क्षेत्र वाढले आहे. शिराळा, तासगाव, पलूस आणि वाळवा तालुक्यातही एक ते दोन हजार हेक्टरने उसाचे क्षेत्र वाढले आहे.
उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे साखर कारखान्यांची उसाची चिंता संपली आहे. मात्र, कारखानदारांनी वेळेत गळीत हंगाम सुरु केला तरच हा ऊस संपणार आहे. दराच्या प्रश्नावरून कारखानदारांनी वेळेवर हंगाम सुरु केला नाही, तर शिल्लक उसाचा प्रश्न भेडसावणार आहे. कारखानदारांनी वेळेवर ऊस गाळपास नेला नाही, तर फार मोठ्या नुकसानीची शक्यता आहे.
अन्य पिकांची शेतकऱ्यांना धास्ती
उसाला चांगला दर मिळू लागल्यामुळे मागील दोन वर्षापासून शेतकरी ऊस पिकाकडे वळला आहे. आता साखरेचे दर गडगडल्यामुळे कारखानदारांनी शेतकऱ्यांना १५०० ते २२०० रुपयांपर्यंत दर दिला आहे. उर्वरित पैसे मिळतील, याची खात्री नाही. तरीही शेतकरी ऊस पिकाकडेच वळत आहे. अर्थात यामध्ये त्या शेतकऱ्यांचीही काही चूक नाही. कारण, अन्य पिकांना कधी अवकाळीचा फटका, तर कधी दलालांच्या साठेबाजीमुळे दराचा फटका बसतो. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहे. या सर्व अडचणी आणि समस्या असूनही शेतकरी ऊस पिकाकडेच वळत आहे.
जिल्ह्यातील उसाचे तालुकानिहाय क्षेत्र
तालुका २०१४-१५ २०१५-१६
मिरज१४१७६१३९०६
वाळवा२९००९२९९०६
शिराळा४५३२६१०७
तासगाव४२६९६४१०
पलूस८९८५९२७४
तालुका २०१४-१५ २०१५-१६
कडेगाव८३००१०१२०
खानापूर११०१३२८०
आटपाडी८७६११८०
क़महांकाळ२६४९३८१०
जत६००१२७४