ऊस तोडीला अवकाळी पावसाचे ग्रहण
By Admin | Updated: November 17, 2014 23:21 IST2014-11-17T22:22:10+5:302014-11-17T23:21:46+5:30
कृष्णाकाठची स्थिती : किमान महिनाभर ऊस तोडी लांबणार

ऊस तोडीला अवकाळी पावसाचे ग्रहण
निवास पवार - शिरटे -विधानसभा निवडणूक, ऊस तोड कामगारांचे आंदोलन यामुळे २0१४—१५ चा गळीत हंगाम आधीच उशिरा सुरु झाला. त्यातच आता अवकाळी पावसाची भर पडली आहे. या अवकाळी पावसामुळे कृष्णा नदीकाठावरील गावांमध्ये किमान महिनाभर तरी ऊस तोड होऊ शकत नाही. याचा फटका शेतकरी वर्गाला बसणार आहे. एकूणच या पावसाचे ऊस तोडीला ग्रहण लागल्याची भावना शेतकरी वर्गातून आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कृष्णाकाठावरील काही कारखान्यांनी गळीत हंगामास सुरुवात केली. ऊस तोडीही सुरु झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. यावर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाशिवाय गळीत हंगाम सुरू झाल्याने कारखानदारांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला होता. परंतु शेतकरी आणि कारखानदारांचा आनंद निसर्गाला मान्य नसावा, म्हणूनच की काय, गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सध्या कृष्णा नदीकाठावरील सर्व ऊस तोडी पूर्णपणे बंद करण्यात आल्या असून, अजून किमान महिनाभर तरी ऊस तोडता येणार नाही. यामुळे यंदाही गळीत हंगाम लांबण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
दरवर्षी आॅक्टोबर महिन्यात ऊस तोडणीचा कार्यक्रम सुरु होतो. नोव्हेंबर, डिसेंबरअखेर अनेक शेतकऱ्यांचा ऊस तुटून जातो. ऊस गेल्यानंतर अनेक शेतकरी त्यामध्ये गहू अथवा इतर पिके घेत असतो. परंतु गेल्या तीन ते चार वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दरासाठीच्या आंदोलनामुळे गळीत हंगाम लांबणीवर पडत गेला. यावर्षी संघटनेचे आंदोलन नसले तरी विधानसभा निवडणूक, ऊस तोडणी कामगारांचे काम बंद आंदोलन व आता अवकाळी पाऊस यामुळे याहीवर्षी हंगाम किमान दोन महिने लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
य. मो. कृष्णा सह. साखर कारखान्याचा अपवाद वगळता कृष्णाकाठावरील सर्वच कारखान्यांनी गळीत हंगामास सुरुवात केली आहे. ऊस तोड सुरु झाली आणि लगेचच अवकाळी पावसाचे थैमान सुरु झाल्याने काही ऊस तोडी निम्म्यावरच थांबवण्यात आल्या आहेत. आता तरी पावसाने विश्रांती घ्यावी, अशीच प्रार्थना करताना शेतकरी वर्ग दिसत आहे.
माळरानाला कमी फटका..!
ज्या शेतकऱ्यांची ऊसशेती माळरानावर आहे, त्यांना या पावसाचा फारसा फरक पडत नाही. पाऊस पडून गेल्यानंतर दोन दिवसात पुन्हा ऊस तोडणी केली तरी चालू शकते. परंतु कृष्णाकाठावरील ऊसशेती बाराही महिने पाण्याखाली असल्याने येथे थोडा पाऊस झाला तरी ८ ते १0 दिवस उसात जाता येत नाही. गेले चार दिवस तर मुसळधार पाऊस पडल्याने किमान महिनाभर तरी तोडी घेता येणार नाहीत.