सांगली जिल्ह्यात १४ लाख रोपे जगवण्यात यश
By Admin | Updated: June 5, 2014 00:21 IST2014-06-05T00:19:00+5:302014-06-05T00:21:05+5:30
रोहयोचाही उपक्रम : वनक्षेत्र वाढणे अशक्य

सांगली जिल्ह्यात १४ लाख रोपे जगवण्यात यश
अंजर अथणीकर ल्ल सांगली जिल्ह्यामध्ये झालेला चांगला पाऊस व प्रशासनाने वृक्ष लागवडीऐवजी संवर्धनाकडे लक्ष दिल्यामुळे १७ लाखपैकी १४ लाख वृक्ष जगवण्यामध्ये त्यांना यश आले आहे. मे महिन्यात केलेल्या सर्व्हेमध्ये ही बाब उघडकीस आली आहे. पहिल्यांदाच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून निराधार, वृध्दांसाठी वृक्ष संवर्धनासाठी रोजगार उपलब्ध करून दिल्याने वृक्ष जोपासण्यात मोठी मदत झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात वन क्षेत्र वाढवणे मोठे आव्हान असल्याचे जाणकार बोलत आहेत. प्रशासनाने गतवर्षी जिल्ह्यात वीस लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी प्रत्यक्षात सतरा लाख वृक्षांची लागवड करण्यात आली. यापूर्वी ५० टक्क्यांहून कमी प्रमाणात वृक्ष जगत होते. यावर्षी मात्र लागवड केलेल्या रोपांपैकी जवळपास ८० टक्के म्हणजे चौदा लाख वृक्ष जगले आहेत. ही बाब मे महिन्यात वन विभागासह इतर विभागांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये स्पष्ट झाली आहे. गतवर्षी चांगला पाऊस झाला त्याचबरोबर पावसाळा लांबलाही होता. जानेवारीपासून मेपर्यंत अवकाळी पावसानेही अनेकदा हजेरी लावल्याने वृक्ष जगण्यास मदत झाली आहे. यावेळी पहिल्यांदाच वृक्ष संवर्धनासाठी महात्मा गांधी रोजगार योजनेच्या माध्यमातून उपक्रम राबवला. सुमारे हजारहून अधिक ज्येष्ठ नागरिक, निराधार, अपंग आदींनी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनाचा रोजगार मिळाला होता. या लोकांना खड्डे खणून वृक्ष लागवड करून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी देण्यात आली होती. यासाठी त्यांना रोजगार देण्यात आला. त्यांनी उन्हाळ्यातही या रोपांना पाणी घातल्याने मोठ्याप्रमाणात वृक्ष जगवण्यास यंदा मदत झाली आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यामातून जिल्ह्यात ७ हजार ७९४ मजूर काम करीत असून, यापैकी सुमारे एक हजार मजूर वृक्ष संवर्धनासाठी काम करीत आहेत. आगामी वर्षासाठी १५ लाख ८७ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी खड्डे खणण्याचे काम अद्याप सुरू असून, या महिन्याच्या मध्यापासून वृक्ष लागवडीला प्रारंभ होणार आहे.