बारावीत नापास झाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या
By Admin | Updated: June 4, 2014 00:05 IST2014-06-04T00:04:07+5:302014-06-04T00:05:38+5:30
कवलापुरातील घटना : विष प्राशन केले

बारावीत नापास झाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या
सांगली : बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने कवलापूर (ता. मिरज) येथील कोमल अनिल सावंत (वय १८) या तरुणीने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. काल (सोमवार) रात्री ही घटना घडली. घटनेची ग्रामीण पोलिसात नोंद आहे. कोमल कवलापुरातील पंडित नेहरु विद्यालयात बारावी कॉमर्स शाखेत शिकत होती. सोमवारी बारावीचा आॅनलाईन निकाल जाहीर झाला. तिला तिच्या मैत्रिणींनी, तुझे तीन विषय गेल्याने तू अनुत्तीर्ण झाली असल्याचे सांगितले. हे ऐकताच तिला धक्का बसला. आई, वडील शेतात गेले होते. तिने विष प्राशन केले. सायंकाळी आई, वडील घरी परतले. दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी हाक मारली. आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, कोमल जमिनीवर लोळत पडली होती. तिने उलट्याही केल्या होत्या. शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असताना मृत्यू झाला. (प्रतिनिधी)