कणखर नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:20 IST2021-06-26T04:20:07+5:302021-06-26T04:20:07+5:30
कार्यकर्त्यावर एकदा विश्वास ठेवला की त्यात तसूभरही कमतरता होणार नाही, याची काळजी आमदार मानसिंगराव नाईक हे नेहमीच घेत आले ...

कणखर नेतृत्व
कार्यकर्त्यावर एकदा विश्वास ठेवला की त्यात तसूभरही कमतरता होणार नाही, याची काळजी आमदार मानसिंगराव नाईक हे नेहमीच घेत आले आहेत. ते कार्यकर्त्याना वेळाेवेळी बळ देतात. अनेक वर्षे ते शिराळा व वाळवा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या प्रत्येक पंचवार्षिकमध्ये वाढतच जात आहे.
आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी जिवाभावाचे कार्यकर्ते निर्माण केले. कार्यकर्त्यांवर ते जिवापाड प्रेम करतात. सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी त्यांचा आग्रह असतो. त्यामुळेच त्यांच्याकडे सक्षम कार्यकर्त्यांची फळी आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात एक दबदबा निर्माण केला आहे. दिलेला शब्द पाळणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. माझ्या कार्यकर्त्याला कसे बळ मिळेल, त्याचा मान-सन्मान कसा वाढेल, त्याचबरोबर सामान्य माणसांच्या जीवनात काहीतरी चांगले घडावे आणि ते आपण घडवावे, यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात. २०१९ च्या निवडणुकीत आमदार म्हणून जनतेने त्यांना दुसऱ्यांदा संधी दिली. दरम्यान, विरोधकांना थोपवून धरत, प्रसंगी त्यांच्यावर मात करून भाऊंनी पक्ष बळकट केला. पक्षावर त्यांनी निष्ठा ठेवून काम केले. पक्षासंदर्भात अशी निष्ठा बाळगून त्यांना काय मिळाले? हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो.
आमदार मानसिंगराव नाईक यांचे कार्यकर्ते नेहमीच त्यांच्या निष्ठेचे दाखले देत असतात. मात्र राजकारणात संयम महत्त्वाचा असतो. त्यांनी अनेक वेळा संयम बाळगल्याने निष्ठावंतांच्या यादीत त्यांचे स्थान अग्रभागी आहे. समाजकारण आणि राजकारणातील चारित्र्यसंपन्न नेता म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. त्यांनी तालुक्यामध्ये विश्वास उद्योग समूह, विराज उद्योग समूह अशा संस्था उभारून शेतकरी आणि तरुणांसाठी राेजगाराच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ दिले. संस्था कशा असाव्यात, याचे आदर्श उदाहरण म्हणून या संस्थांचा उल्लेख होतो.
सत्तेचे पाठबळ असो अगर नसो; आपल्या विचार व कृतीवर ठामपणे उभे राहणाऱ्या या नेत्याने राजकारणातील साधनशुचितेला प्राधान्य दिले. कधीही विचारांशी तडजोड केली नाही किंवा कुणाशी अभद्र युतीही केली नाही.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील हे वैशिष्ट्य त्यांना इतर राजकारण्यांपासून वेगळे बनविते. आपल्या विचारांशी अशी बांधिलकी जपणारा राजकारणी आजच्या राजकारणात अभावानेच आढळतो. उभे आयुष्य सामान्य माणसाला उभे करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या या कणखर नेतृत्वाला परमेश्वर निरोगी, दीर्घायुष्य देवो! वाढदिवसाच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा..!
------------------------— शंकर वसंत मोहिते
(खोतवाडी-सोनवडे)