जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:26 IST2021-04-11T04:26:01+5:302021-04-11T04:26:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : वीकेेंड लॉकडाऊनला पहिल्याच दिवशी सांगली जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी कडकडीत बंद पाळून शासन ...

जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत लॉकडाऊन
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : वीकेेंड लॉकडाऊनला पहिल्याच दिवशी सांगली जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी कडकडीत बंद पाळून शासन व जिल्हा प्रशासनाच्या कोरोना साखळी तोडण्याच्या प्रयत्नांना बळ दिले. शहरी भागांपासून छोट्या गावांपर्यंत सर्वत्र रस्ते, चौक, बाजारपेठा ओस पडल्या होत्या.
जिल्ह्यात शासनाने जाहीर सोमवार ते शुक्रवारपर्यंतच्या निर्बंधांबद्दल गेल्या काही दिवसांपासून व्यापारी व व्यावसायिकांमधून संताप व्यक्त केला जात असताना वीकेंड लॉकडाऊनला मात्र उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शासनाने व जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये ज्यांना मुभा दिली, ते व्यवसायही बंद राहिले. रस्ते, चौक, बाजारपेठा शांत झाल्या. दिवसभर गावे, शहरे निर्मनुष्य असल्याचे भासत होती.
जिल्ह्यात वाळवा, शिराळा, मिरज, तासगाव, पलूस, कडेगाव, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, खानापूर या सर्व तालुक्यांमध्ये शांतता होती. शुक्रवारी रात्री आठ वाजता सुरू झालेला लॉकडाऊन सोमवारी सकाळपर्यंत कायम राहणार आहे. शुक्रवारी आठच्या ठोक्याला सर्व बाजारपेठा व व्यवसाय बंद झाले. संचारबंदीलाही तसाच प्रतिसाद लाभल्यामुळे शांतता दिसून आली. बस आणि रिक्षांसह खासगी प्रवासी आणि मालवाहतूक ठप्प होती.
शहरांसह छोटी छाेटी गावेही ओस पडल्याचे चित्र होते. नागरिक घराबाहेर न पडल्यामुळे पोलिसांवर फारसा ताण पडला नाही. जिल्ह्यात केवळ रुग्णालये, डायग्नोस्टिक सेंटर्स, औषधांची दुकाने, एटीएम व पेट्रोलपंप सुरू होते. अन्य सेवा व व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. शहरातील तसेच गावातील नेहमी गजबजणाऱ्या परिसरांमध्ये शुकशुकाट पसरला होता.
चौकटी
पेट्रोलपंपही ओस
नागरिकच घराबाहेर न पडल्याने अनेक पेट्रोलपंप ओस पडले होते. वाहनांच्या प्रतीक्षेत कर्मचाऱ्यांना दिवसभर थांबावे लागले. पोलीस व सरकारी कर्मचारी वगळता पेट्रोलपंपावरही कोणी फिरकले नाही.
चाैकट
भाजीपाला वाहतूकही ठप्प
भाजीपाला वाहतुकीस मुभा दिली असली तरी तीही शनिवारी होऊ शकली नाही. विक्रेत्यांनी स्वत:हून लाॅकडाऊनमध्ये सहभाग घेतला. याशिवाय इतर मालवाहतूक, प्रवासी वाहतूकही पूर्णपणे बंद राहिली. बसस्थानके भकास दिसत होती.