आटपाडीत तहसील कर्मचाऱ्यांचे काम बंद
By Admin | Updated: June 18, 2014 01:24 IST2014-06-18T01:20:39+5:302014-06-18T01:24:48+5:30
नागरिकांचे हाल : सेतू कार्यालयही बंद; आजही आंदोलन

आटपाडीत तहसील कर्मचाऱ्यांचे काम बंद
आटपाडी : आटपाडीचे तहसीलदार जोगेंद्र कट्यारे यांच्यासह महसूल कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करावी, या मागणीसाठी आटपाडी तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज (मंगळवार) काम बंद आंदोलन केले. तहसील कार्यालयाच्या सर्व विभागांना आज प्रथमच कुलपे लावलेली तालुकावासीयांनी पाहिली. मात्र आंदोलनामुळे लोकांचे हाल झाले.
खरसुंडी (ता. आटपाडी) येथे २० नोव्हेंबर २०१३ रोजी वाळू वाहतूक करणारी तीन वाहने तहसीलदार कट्यारे यांच्यासह महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अडविली होती. खरसुंडी पोलीस ठाण्याच्या आवारात ही वाहने उभी करण्यात आली. प्रकरण मिटविण्यासाठी प्रत्येक वाहनामागे एक लाख, अशी एकूण तीन लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप करून वाहनमालक बापू कर्चे यांनी आटपाडी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने तहसीलदार जोगेंद्र कट्यारे, खरसुंडीचे मंडल अधिकारी एस. एच. जमादार, झरे गावचे तलाठी व्ही. आर. जाधव, घाणंदचे कोतवाल संजय सोपान माने, खरसुंडीचे कोतवाल नवनाथ डमकले या सर्वांवर गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश आटपाडी पोलिसांना दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर महसूल कर्मचारी संघटना, वाहनचालक आणि कोतवाल संघटना, राजपत्रित अधिकारी संघटना या संघटनांच्यावतीने आज (दि. १७) आणि उद्या (दि. १८) तहसील कार्यालयातील सर्व कामकाज बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नेहमी गजबजलेले तहसील कार्यालय आज सुने-सुने वाटत होते. (वार्ताहर)