बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) येथील सिध्दार्थनगरजवळ महामार्गाच्या मध्यमागी तब्बल चार महिन्यांपासून पडलेला खडीचा ढीग रविवारी हटवण्यात आला. हा ढीग हटवावा, यासाठी ‘लोकमत’ने आवाज उठवला होता, त्याला यश आले.
सिध्दार्थनगर येथे मलकापूर-पंढरपूर महामार्गाच्या कामासाठी साईडपट्टीपासून मध्यभागापर्यंत खडीचा मोठा ढीग टाकला होता. यामुळे रात्रीच्यावेळी वाहतूक करणाऱ्यांना हा ढीग दिसत नसल्यामुळे अनेक वाहनांचे अपघात होत होते. त्यामुळे स्थानिक नागरिक व वाहनधारकांमधून हा ढीग तेथून हटवावा, अशी मागणी होत होती.
मात्र, याबाबत वारंवार ठेकेदाराला कल्पना देऊनही दुर्लक्ष होत होते. मात्र ‘लोकमत’ने याबाबत बातमी प्रसिद्ध करताच ठेकेदाराला जाग आली व त्याने हा ढीग दुसऱ्याच दिवशी हटवून पूर्ण रस्ता वाहतुकीसाठी रिकामा केला.