पाणी योजनेच्या पाण्याचा शेतीसाठी चोरून वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:25 IST2021-02-14T04:25:00+5:302021-02-14T04:25:00+5:30
वलखड येथे जलस्वराज्य योजनेतून बांधण्यात आलेल्या विहिरीतून सार्वजनिक नळ पाणीपुरवठा करण्यात येतो. गट नं. ९४२ मधील त्या विहिरीलगत ग्रामपंचायतीचे ...

पाणी योजनेच्या पाण्याचा शेतीसाठी चोरून वापर
वलखड येथे जलस्वराज्य योजनेतून बांधण्यात आलेल्या विहिरीतून सार्वजनिक नळ पाणीपुरवठा करण्यात येतो. गट नं. ९४२ मधील त्या विहिरीलगत ग्रामपंचायतीचे शिपाई गौतम सखाराम कांबळे यांची स्वमालकीची शेतजमीन आहे. त्या शेतजमिनीत सध्या ज्वारी, लसूण, आदी पिके घेतली आहेत. त्या पिकांसाठी सार्वजनिक विहिरीतून चोरून पाणी देण्यात येत आहे. पाणीपुरवठा टाकीकडे जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीला अनधिकृतरीत्या दुसरी पाईप जोडून ते पाण्याची चोरी करीत आहेत.
तसेच ग्रामपंचायत सदस्य असलेल्या उत्तम तुकाराम कांबळे यांच्या नावे गट नं. २३ मध्ये घर नसतानाही सत्ताधारी सरपंच, उपसरपंच व पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून व पदाचा गैरवापर करीत मनमानी कारभाराने गावालगतच्या शेतात पाणीपुरवठा योजनेचे अनधिकृत नळ कनेक्शन घेतले आहे. त्यातून मका व लसूण पिकांना पाणी दिले जात आहे. एकीकडे गावातील काही वस्त्यांवर लोकांना पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नसताना व पाणीटंचाई जाणवू लागली असताना ग्रामपंचायतीचे सदस्य व शिपाई यांनी मनमानी कारभार करीत सार्वजनिक नळपाणी पुरवठा योजनेचे पिण्याचे पाणी शेतीसाठी वापरण्याचा पराक्रम सुरू केला आहे. याबाबत लोकांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडे अनेक वेळा तक्रारी करूनही त्यांची दखल घेतली जात नाही.
त्यामुळे या प्रकरणी वरिष्ठ पातळीवरून लक्ष घालून सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या पिण्याच्या पाण्याचा शेतीसाठी वापर करणारे सदस्य उत्तम कांबळे व शिपाई गौतम कांबळे यांच्यावर कारवाई करून या दोघांनाही पदावरून हटवावे, अशी मागणी माजी सदस्य उत्तम जगताप यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व खानापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी केली.
फोटो : १३०२२०२१-विटा-वलखड वॉटर
ओळ : वलखड (ता. खानापूर) येथे सार्वजनिक नळ पाणीपुरवठा विहिरीच्या मुख्य जलवाहिनीला दुसरी पाईप जोडून पाण्याची चोरी करून शेतीपिकांना पाणी दिले जात आहे.