फळबाजारातील गाळ्यांमध्ये सभापतींनी मारला पाच कोटींचा गाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:28 IST2021-01-08T05:28:33+5:302021-01-08T05:28:33+5:30

सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विष्णुअण्णा पाटील फळबाजारात गाळ्यांना परवानगी देऊन सभापतींनी पाच कोटींचा गाळा मारल्याचा आरोप शिवसेना ...

Speakers hit Rs 5 crore in the fruit market | फळबाजारातील गाळ्यांमध्ये सभापतींनी मारला पाच कोटींचा गाळा

फळबाजारातील गाळ्यांमध्ये सभापतींनी मारला पाच कोटींचा गाळा

सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विष्णुअण्णा पाटील फळबाजारात गाळ्यांना परवानगी देऊन सभापतींनी पाच कोटींचा गाळा मारल्याचा आरोप शिवसेना नेते रावसाहेब घेवारे यांनी केला. समितीत त्यांनी मोठा भ्रष्टाचार केला असून, तो लपविण्यासाठीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आश्रय घेतल्याचे घेवारे म्हणाले. सभापती पाटील यांनी आरोप फेटाळून लावले.

घेवारे यांनी पत्रकार बैठकीत आरोप केला की, व्यापारी गाळ्यांसाठी समितीने सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे परवानगी मागितली होती; पण पणन संचालकांनी ती दिली नाही, तरीही गाळे उभारले जात आहेत. ११ महिन्यांच्या कराराने व महिन्याला नाममात्र ३०० ते ५०० रुपयांच्या भाड्यावर गाळे दिले आहेत. प्रत्यक्षात प्रत्येक गाळेधारकांकडून पाच ते आठ लाख रुपये घेतल्याची चर्चा आहे. पावती फक्त ५० हजारांच्या अनामतीची दिली आहे. एकूण व्यवहारात किमान पाच कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. यामध्ये उपनिबंधकांनीही बघ्याची भूमिका घेतली आहे. यावर कारवाई झाली नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलनासाठी रस्त्यावर येऊ. बैठकीला शिवसेनेचे अनिल शेटे, जितेंद्र शहा, प्रभाकर कुरळपकर हेदेखील उपस्थित होते.

चौकट

महापालिकेने बजावली नोटीस

गाळ्यांसंदर्भात महापालिकेने नोव्हेंबरमध्ये समितीला नोटीस बजावली होती. परवानगीशिवाय बेकायदेशीररीत्या बांधले जाणारे गाळे ४५ दिवसांत काढून घेण्यास बजावले होते. अन्यथा गाळे पाडण्याचा इशाराही दिला होता; पण नोटिसीनंतर महापालिकेने पुढे कार्यवाही केली नाही.

चौकट

दोन वर्षे लेखापरीक्षणच नाही

घेवारे यांनी समितीच्या लेखापरीक्षणाचा तपशील माहिती अधिकारात मागितला होता, त्यावर २०१८-१९ व २०१९-२० या दोन वर्षांचे लेखापरीक्षण पूर्ण नसल्याने माहिती देऊ शकत नसल्याचा खुलासा विशेष लेखापरीक्षकांनी केला आहे.

चौकट

पैशांसाठी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न

या संदर्भात सभापती दिनकर पाटील म्हणाले की, लेखापरीक्षणाची जबाबदारी शासनाची आहे. गाळ्यांसाठी पणन संचालकांनी रितसर परवानगी दिली आहे. घेवारे यांचे आरोप फक्त पैशांसाठी असून ब्लॅकमेल करीत आहेत. पुरावे असल्यास त्यांनी कायदेशीर मार्गांनी योग्य तेथे दाद मागावी.

---------------

Web Title: Speakers hit Rs 5 crore in the fruit market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.