सांगली : माणसाचा सहजिवी म्हणून चिमण्यांची ओळख असली तरी तिच्या घटत्या संख्येची चिंता व्यक्त होत आहे. तिच्या संवर्धनाच्या मोहिमा आखल्या जात असताना प्राणीमित्रांनी तिच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी एक छत्री उभी केली आहे. याच चळवळीत रमलेल्या अॅनिमल फाऊंडेशनच्या पथकाने मंगळवारी पाय चिकटलेल्या दोन चिमण्यांची मुक्तता करीत त्यांचे विहाराचे स्वप्न साकार केले.शिवोदयनगरमधील एका घराबाहेर बंद स्थितीत असलेल्या दुचाकीच्या हेडलाईट कव्हरच्या मोकळ््या जागेत चीरक (इंडियन रॉबिन) या चिमणीने घरटे बांधले. विणीचा हंगाम सुरू असल्याने लगबगीने हे घरटे तयार केले. तिला दोन पिली झाली. चोचीत अन्न, पाणी आणून ती पिलांना भरवायलाही लागली. पिली उडण्याच्या अवस्थेला आल्यानंतर किलबिलाट सुरू झाला. पिली उडायचा प्रयत्न करायची आणि खाली कोसळायची.
पुन्हा त्यांना त्यांच्या घरट्यात सोडले की पुन्हा तोच प्रकार व्हायचा. त्या दोन्ही पिलांचा एक पाय एकमेकांना जन्मजात चिकटला होता. पिले खाली पडली की कुत्री, मांजरी त्यांच्यावर ताव मारण्यासाठी टपून बसलेली असायची, त्यामुळे पिलांच्या आईचा जीव टांगणीला लागला होता.
प्राणीमित्रांनी अत्यंत कष्टाने व अलगदपणे दोन्ही पिलांना स्वतंत्र केले. एका चिमणीच्या पायाला कापड बांधून दोघांनाही घरट्यात पूर्ववत ठेवण्यात आले. दोन्ही पिलांना जिवदान मिळाले. आकाशात विहाराचे पिलांचे व तिच्या आईचे स्वप्न साकार करण्यासाठी प्राणीमित्रांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक येथील नागरिकांतून होत आहे.