रिक्षाचालकांचे कधी राईट, तर कधी लेफ्ट, दादागिरीमुळे नागरिक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:28 IST2021-09-21T04:28:34+5:302021-09-21T04:28:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहराच्या क्षमतेपेक्षा रिक्षाचे जादा परवाने दिल्याने सर्वच रस्त्यांवर त्यांचा सुळसुळाट झाला आहे. महापालिका क्षेत्रात ...

रिक्षाचालकांचे कधी राईट, तर कधी लेफ्ट, दादागिरीमुळे नागरिक हैराण
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहराच्या क्षमतेपेक्षा रिक्षाचे जादा परवाने दिल्याने सर्वच रस्त्यांवर त्यांचा सुळसुळाट झाला आहे. महापालिका क्षेत्रात रिक्षांच्या उच्छादामुळे पादचारी आणि छोटे वाहनचालक हैराण झाले आहेत. बहुतांश बसथांबे रिक्षाचालकांनी अनधिकृतरीत्या हायजॅक केले आहेत, शिवाय अनेक ठिकाणी बेकायदा थांबेही निर्माण केले आहेत. यामुळे वाहतूक व्यवस्थापन धाब्यावर बसविले जात आहे. सांगली-मिरज रस्त्यावर नियम तोडून बेफाम धावणाऱ्या रिक्षा अनेकांच्या जिवाला धोका निर्माण करत आहेत. अधिकाधिक प्रवासी मिळविण्याच्या स्पर्धेत भरधाव पळवल्या जात आहेत. वाट्टेल तिथे अचानक ब्रेक मारून थांबवल्या जातात. हात किंवा सिग्नल न दाखताच अचानक वळवल्या जातात. भर गर्दीत घुसवून वाहतुकीचा फज्जा उडवला जातो. एखाद्या सजग नागरिकाने जाब विचारण्याचा प्रयत्न केला, तर चक्क त्याच्या अंगावर धाऊन जाण्याचे प्रकार घडतात.
बॉक्स
रिक्षाचालकांच्या दादागिरीने नागरिक हैराण
सिटी पोस्टासमोर बेकायदा थांबा
सांगलीत सिटी पोस्टासमोर रिक्षाचालकांनी बेकायदा थांबा निर्माण केला आहे. वाहतुकीला अडथळा करत रिक्षा थांबवल्या जातात. विशेष म्हणजे, बेकायदा थांब्याला लागूनच वाहतूक पोलिसांचा पॉईन्टही आहे.
बसस्थानकासमोर दादागिरी
बसस्थानकासमोरही रांगेतील रिक्षाचालकांवर शिरजोरी करत बेकायदा थांबा निर्माण केला आहे. मिरजेला प्रवासी नेणाऱ्या रिक्षाचालकांची येेथे दिवसभर दादागिरी सुरू असते.
सिव्हिल रुग्णालयासमोर मनमानी
शासकीय रुग्णालयासमोर वाहतुकीची कोंडी करत रिक्षा थांबवल्या जातात. रस्ता अडवल्याने अनेकदा जीवघेणे अपघातही झाले आहेत. या सर्व ठिकाणी पोलिसांनी कारवाई करणे टाळले आहे.
बॉक्स
वाट्टेल तसे भाडे
- शहरांतर्गत शहरी बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाली नसल्याचा गैरफायदा रिक्षाचालक उठवत आहेत.
- सांगली-मिरज प्रवासासाठी चक्क ५० रुपयांपर्यंत भाडे वसूल केले जात आहे.
- विस्तारित भागात जाण्यासाठी तर रिक्षाचालक सांगेल तेच भाडे द्यावे लागते.
बॉक्स
पोलीस, आरटीओ कारवाई करणार कधी?
गणेशोत्सवात खरेदी करून परतताना शिवाजी मंडई ते संजयनगरसाठी १२५ रुपये भाडे रिक्षाचालकाने घेतले. रिक्षाचालकांच्या मनमानीवर पोलीस कारवाई कधी करणार, असा प्रश्न पडतो.
- रोहिणी लांडगे, संजयनगर, सांगली
सांगली-मिरज रस्त्यावर जीव मुठी धरूनच दुचाकी चालवावी लागते. एखादी रिक्षा कधी आडवी येऊन अपघात घडवेल याचा नेम नसतो.
- नरेश साने, सांगली
कोट
नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर सतत कारवाया सुरू असतात. अनधिकृत थांब्यावरील रिक्षांचे फोटो काढून ऑनलाईन दंड केला जातो. राजवाडा चौकात वाहतूक पोलीस नसल्याचे पाहून रिक्षा थांबवल्या जातात. त्यांच्यावर यापूर्वीही कारवाया केल्या आहेत. सध्या गणेशोत्सवाच्या बंदोबस्तामुळे कारवाया थोड्या कमी झाल्या आहेत.
- प्रज्ञा देशमुख, सहायक निरिक्षक, वाहतूक शाखा