सौरऊर्जेतून शेतकऱ्यांच्या जीवनात प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:22 IST2020-12-26T04:22:01+5:302020-12-26T04:22:01+5:30

सांगली : जिल्ह्यातील २८ ठिकाणी १४० मेगावॅटचे सौरऊर्जेचे प्रकल्प तयार होणार आहेत. या ठिकाणी तयार होणारी वीज कृषिपंपांना दिवसा ...

Solar energy illuminates the lives of farmers | सौरऊर्जेतून शेतकऱ्यांच्या जीवनात प्रकाश

सौरऊर्जेतून शेतकऱ्यांच्या जीवनात प्रकाश

सांगली : जिल्ह्यातील २८ ठिकाणी १४० मेगावॅटचे सौरऊर्जेचे प्रकल्प तयार होणार आहेत. या ठिकाणी तयार होणारी वीज कृषिपंपांना दिवसा अखंडित आठ तास देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनातील गेल्या ३० वर्षांतील अंधार संपुष्टात येऊन त्यांच्या जीवनात सौरऊर्जेचा प्रकाश पडणार आहे.

शेतकऱ्यांना ३० वर्षांत कृषिपंपांना अखंडित दिवसा वीज मिळतच नाही. अपवादात्मक दिवस वीज मिळते, तीही अखंडित नाही. बहुतांश वेळा रात्रीचीच वीज मिळते. रात्रीच्या भारनियनामुळे सर्पदंश, हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात अनेक शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले आहेत. यावर उपाय म्हणून शासनाने सौरऊर्जेचा चांगला मार्ग स्वीकारला आहे. या ऊर्जेतून शेतकऱ्यांच्या जीवनात प्रकाश पडणार आहे. ते म्हणजे, महावितरण कंपनी ज्या गावांमध्ये जागा उपलब्ध होईल. तेथे चार ते पाच मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प करणार आहे. येथे तयार वीज जवळच्या वीज उपकेंद्रात एकत्रित करून त्या गावातील शेतीपंपाला दिवसा अखंडित आठ तास देणार आहे. जनरेशन कंपनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमधून जत तालुक्यातील उमदी, उटगी, सोनलगी, वाळेखिंडी, बोर्गी खुर्द, दरीकुणूर; खानापूर तालुक्यातील नागेवाडी, मिरज तालुक्यातील आरगची निवड केली आहे. या ठिकाणी दोन ते सहा मेगावॅटपर्यंत सौरऊर्जा प्रकल्प होणार आहे. महावितरणनेही केंद्र शासनाच्या योजनेतून आटपाडी तालुक्यातील करगणी, माडगुळे, झरे, जत तालुक्यातील कोसारी, डफळापूर, जिरग्याळ, बनाळी, आसंगी, असंगी तुर्क, कोंत्यावबोबलाद, कंठी, बिर्नाळ, खानापूर तालुक्यातील आळसंद, पारे, कवठेमहांकाळ तालुक्यातील करोली टी, म्हैसाळ एम, वाळवा तालुक्यातील बहादूरवाडी, किल्ले मच्छिंद्रगड, लवाणमाची, आदी २० ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्पासाठी निश्चित केली आहेत. एक प्रकल्प उभारणीसाठी पाच ते दहा एकर जागेची गरज आहे. एक टक्काही प्रदूषण नसणारा आणि कमी खर्चातील हा यशस्वी प्रकल्प आहे.

चाैकट

कसबे डिग्रजचा प्रकल्प यशस्वी

महावितरणने कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे साडेचार मेगावॅटचा सौरऊर्जेचा प्रकल्प तयार केला आहे. महावितरणाला सव्वादोन ते अडीच रुपये प्रतियुनिटने वीज मिळत आहे. अन्य प्रकल्पांतून सध्या महावितरण साडेचार ते पावणेपाच रुपये प्रतियुनिटने वीज खरेदी करत आहे. या प्रकल्पातून तयार झालेली वीज तुंग (ता. मिरज) येथील उपकेंद्राला जोडली आहे. या केंद्रातील कृषी पंपांना दिवसा आठ तास वीज उपलब्ध होत आहे, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Solar energy illuminates the lives of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.