फोटो आहे...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाच्या खडतर वाटेवरही आधारवड बनून भक्कमपणे समाजाला मदत करण्याचे काम भारतीय जैन संघटना व राजमती ट्रस्टने सांगली जिल्ह्यात केले. कोरोनाच्या तीव्र झळा एका बाजूला त्रासदायी ठरल्या असताना, संघटनांच्या मदतीच्या शीतल लाटांनी या संकटाची तीव्रता कमी केली. कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर पुन्हा या संघटना सज्ज झाल्या आहेत.
कोरोनाग्रस्तांना आजारातून बाहेर काढत असतानाच कोरोना होऊच नये, म्हणूनही भारतीय जैन संघटना व राजमती ट्रस्टने काम केले. कोरोनाची सुरुवात झाली, तेव्हा किरकोळ आजारांसाठीही उपचार मिळणे सामान्यांना परवडत नव्हते. अशावेळी ‘डॉक्टर आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू करून शहरात ठिकठिकाणी फिरते दवाखाने सुरू केले. ८ बसेसच्या माध्यमातून राबविलेल्या उपक्रमात १० हजार नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण केली.
भगवान महावीर कोविड सेंटर उभे करुन समाजातील दानशुरांकडून अनेक वैद्यकीय उपकरणे सेंटरसाठी घेतली. २५० हून अधिक रुग्णांना दररोजचे जेवण व मोफत औषधे देण्याचे काम केले. हजारो रुग्णांना यातून सेवा देण्यात आली. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही भगवान महावीर कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
कोरोना काळात वैद्यकीय व सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या नियोजनात कमी पडत असल्याने, कोरोना कमांडो हा उपक्रम राबवून १ हजार तरुणांना प्रशिक्षित केले. त्यांच्यामार्फत वैद्यकीय सेवा गावोगावी पोहोचविली. ५ हजार लोकांना मास्क व १ हजार लोकांना दिवाळी किटचे वाटप राजमती ट्रस्टमार्फत केले. भारतीय जैन संघटनेच्या वतीने राज्यासह सांगलीत मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिर घेतले. या रक्तदान चळवळीमुळे कोरोना काळात गरजू रुग्णांना वेळेत रक्तपुरवठा होऊन त्यांचा जीव वाचला. या सर्व कार्याची दखल घेऊन तरुण सागर महाराजांच्या संस्थेमार्फत ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश पाटील यांना नॅशनल एक्सलन्स अवाॅर्ड, भारतीय जैन संघटनेमार्फत नॅशनल अवॉर्ड व राजस्तरीय तीन पुरस्कार देण्यात आले.