जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांमधून निघतोय कडवट प्रश्नांचा धूर

By Admin | Updated: November 23, 2015 00:29 IST2015-11-22T22:57:30+5:302015-11-23T00:29:44+5:30

उद्योगांची संख्या घटली : भांडवल, मनुष्यबळाऐवजी निर्माण झाल्या अडचणी, रोजगार निर्मितीलाही बसला मोठा फटका--गुऱ्हाळघरांना घरघर-१

Smoke of hard questions arising out of the guerrillas in the district | जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांमधून निघतोय कडवट प्रश्नांचा धूर

जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांमधून निघतोय कडवट प्रश्नांचा धूर

सहदेव खोत -- पुनवत -भांडवल व मनुष्यबळाचा अभाव, वाढलेला उत्पादन खर्च, उद्योगाकडे झालेले शासनाचे दुर्लक्ष व गुळात शेतकऱ्यांची होत असलेली गळचेपी अशा अनेक कारणांनी शिराळा व शाहूवाडी तालुक्याच्या वारणा, कडवी पट्ट्यातील गुऱ्हाळ उद्योग पुरता अडचणीत आला आहे. यावर्षी गुऱ्हाळ घरांच्या कमी झालेल्या संख्येवरून या उद्योगाला लागलेली उतरती कळा स्पष्टपणे जाणवत आहे. यंदाच्या हंगामात तर कित्येक गुऱ्हाळ मालकांनी या उद्योगाचा नादच सोडून दिला आहे. हंगाम सुरू करण्यासाठी ४ ते ५ लाखांपर्यंतचे भांडवल उभारणे शक्य नसल्याने तसेच मजूर नसल्याने अनेकांनी या उद्योगातून अंग काढून घेतले आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात वारणा पट्ट्यात केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच गुऱ्हाळ घरे उरली आहेत. काही ठिकाणी तर बंद गुऱ्हाळ घरांचे केवळ अवशेष दिसत आहेत.
सध्या अस्तित्वात असलेल्या गुऱ्हाळ घरांतून जिवाचे रान करून शेतकऱ्यांनी तयार केलेल्या गुळाला योग्य भाव मिळत नाही. गुऱ्हाळ उद्योगासाठी शासनाकडून प्रोत्साहनपर कोणतेही अनुदान नाही किंवा गुऱ्हाळ उद्योगाच्या उभारणीसाठी कर्जही नाही. गुऱ्हाळमालकांना या उद्योगासाठी पुरेसे मनुष्यबळ मिळत नाही. मनुष्यबळ मिळाले तर त्यांना टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक निधी नाही. वीजदर, इंधनाच्या दरात झालेली प्रचंड वाढ, गूळ उत्पादनासाठी आवश्यक पावडर, अ‍ॅसिड, भेंडी पावडर यांच्या वाढलेल्या किमती आदी अनेक कारणांनी गुऱ्हाळ उद्योगाचा ऱ्हास होऊ लागला आहे.


शिराळा, शाहूवाडी तालुक्यातील वारणा, कडवी नदीचा पट्टा हा उसपट्टा म्हणून ओळखला जातो. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या गुऱ्हाळ घरांनी व त्यात तयार होणाऱ्या अविट चवीच्या गुळाने या पट्ट्याची वेगळीच ओळख निर्माण केली. या गुऱ्हाळ घरांनी हजारोजणांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करून दिले. गोडव्याची निर्मिती करणाऱ्या या गुऱ्हाळघरांमधून आता प्रश्नांच्या कडवटपणाचा धूर बाहेर पडत आहे. याच कडवट धुरात आता चालकांची होत असलेली घुसमट आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न यावर प्रकाशझोत टाकणारी मालिका वाचा आजपासून....

यावर्षी गुऱ्हाळ घरांची संख्या घटली आहे. गुळाला दर नसल्याने शेतकरी गुऱ्हाळ घरांकडे ऊस पाठवायला तयार नाहीत. शेतकऱ्यांची गळितासाठी मनधरणी करावी लागत आहे. चांगल्या प्रतीचा ऊस शेतकरी गुऱ्हाळात गाळायला तयार नाहीत. गुऱ्हाळ उद्योगासाठी ही धोक्याची घंटा आहे.
- प्रदीप पाटील, गुऱ्हाळ मालक, कणदूर

एकंदरीत गुऱ्हाळ उद्योग हा विविध समस्यांच्या गर्तेत अडकला असून, अत्यावश्यक पदार्थ म्हणून शासनाने या उद्योगाला उर्जितावस्था देण्यासाठी पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: Smoke of hard questions arising out of the guerrillas in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.