पतंगरावांनी घसरुन पडण्यापेक्षा सावरावं !
By Admin | Updated: May 3, 2015 00:57 IST2015-05-03T00:55:18+5:302015-05-03T00:57:13+5:30
जयंत पाटील : सहकार खात्याचा गैरवापर केला

पतंगरावांनी घसरुन पडण्यापेक्षा सावरावं !
नेवरी : जिल्हा बॅँक व बाजार समितीच्या लोकनियुक्त संचालकांना अधिकारापासून दूर ठेवण्यासाठी सहकार खात्याचा गैरवापर करून बॅँकेवर व बाजार समितीवर प्रशासक नेमले गेले. शेतकऱ्याचा आर्थिक कणा असलेल्या बॅँकेमध्ये पक्षीय राजकारण नको. आम्ही समविचारी लोकांना बरोबर घेऊन निवडणूक लढवत आहोत. टीका टिप्पणी करून सारखे घसरणे आम्हाला शोभत नाही. घसरून पडणे आम्हाकडून होत नाही. त्यामुळे तुम्ही पडू नका, अशी टीका शेतकरी सहकार पॅनेलचे नेते आमदार जयंत पाटील यांनी माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे नाव न घेता केली.
रायगाव (ता. कडेगाव) येथे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी शेतकरी सहकार पॅनेलची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख अध्यक्षस्थानी होते.
जयंत पाटील म्हणाले की, आम्ही सुरुवातीपासून सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला; परंतु काही मंडळींनी सवतासुभा मांडल्याने त्यांच्या मागणीप्रमाणे जागा देणे शक्य नव्हते. विरोधकांना प्रत्यक्षात सत्ता मिळविणे शक्य नव्हते.
सारखेसारखे बोलून घसरण्यापेक्षा व घसरून पडण्यापेक्षा विरोधकांनी थोडे स्वत:ला सावरायला हवे, अशी बोचरी टीका पाटील यांनी डॉ. पतंगराव कदम यांचे नाव न घेता केली. खासदार संजय पाटील म्हणाले की, चांगल्या विचाराने काम करणारे लोक बँकेत आले पाहिजेत. शेतकरी सहकार पॅनेल पूर्णपणे पक्षविरहित आहे.
यावेळी संग्रामसिंह देशमुख यांनी मजूर संस्थांची ई-टेंडर प्रणाली, व्हॅट, आयकर, आदी प्रश्नांवर तोडगा काढण्याची मागणी केली. बिनविरोध निवडून आलेल्या दिलीप पाटील यांचा सत्कार करण्यात आला. पृथ्वीराज देशमुख यांनी स्वागत केले. विलासराव शिंदे, अरुणअण्णा लाड, लालासाहेब यादव, प्रा. सिकंदर जमादार आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मजूर फेडरेशनचे माणिकराव जाधव, डॉ. पृथ्वीराज चव्हाण, धोंडीराम महींद, सौ. कमल पाटील, सौ. श्रद्धा चरापले, सुरेश पाटील, बी. के .पाटील, विष्णू माने, चंद्रकांत हाक्के, बाळासाहेब होनमोरे, चंद्रसेन देशमुख, दत्तूशेठ सूर्यवंशी उपस्थित होते. सतीश देशमुख यांनी आभार मानले. (वार्ताहर)बाजार समितीवर जाणूनबुजून प्रशासक
लोकनियुक्त संचालकांना त्यांनी काम करू न देता कामापासून व अधिकारापासून दूर ठेवले. मध्यंतरी बँकेवर प्रशासक असल्यामुळे अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मदत करू शकलो नाही. आमच्यासमोर जे पॅनेल आहे, त्यांना उमेदवारही देता आले नाहीत. त्यांना तत्त्वाची, विचारांची जोड नाही. वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी निवडणूक लढविणाऱ्यांचा निर्णय मतदारांनी घ्यावा.