कौशल्याच्या कौशल्यापुढे परिस्थितीही नतमस्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:22 IST2021-03-07T04:22:57+5:302021-03-07T04:22:57+5:30
अशुतोष कस्तुरे पलूस : कुस्तीसाठी महिलांना दिलेला पहिला शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या कौशल्या वाघ रायगाव (ता. कडेगाव) येथे महिलांसाठी ...

कौशल्याच्या कौशल्यापुढे परिस्थितीही नतमस्तक
अशुतोष कस्तुरे
पलूस : कुस्तीसाठी महिलांना दिलेला पहिला शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या कौशल्या वाघ रायगाव (ता. कडेगाव) येथे महिलांसाठी तालीम उभी करत आहेत. ही तालीम महाराष्ट्रातील एका महिलेने महिलांसाठी उभी केलेली पहिलीच तालीम असेल.
कौशल्या वाघ यांच्या घराला कुस्तीची मोठी परंपरा, परंतु परिस्थिती हलाखीची असल्याने वडील कृष्णात वाघ मुंबईत कामासाठी गेले. तेथील मानखुर्द येथे दहा बाय दहाची तालीम बांधली. कौशल्या यांनी घरचीच तालीम असल्याने १९९८ पासून कुस्तीचे धडे घेण्यास सुरुवात केली. यात्रांमधील मैदानांमध्ये चुणूक दाखवली. जगमलसिंग यांनी त्यांना मुंबईतील महिलांच्या पहिल्या संघातून २००२ मध्ये खेळविले. त्यांनी राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले. २००५ ला पुण्यातील सबज्युनिअर स्पर्धेतही सुवर्णपदक कमावले. २००६ ला बँकॉकमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये महिलांमधून पहिले रौप्यपदक महाराष्ट्राला मिळवून दिले. २०१२ मध्ये उत्तर प्रदेश येथे पहिले रौप्यपदक मिळवले. दरम्यान, गुडघ्याच्या लिगामेंटची तीनवेळा, तर खांद्याची एकदा शस्त्रक्रिया झाली. दुखापतीमुळे ऑलिम्पिकमध्ये खेळू शकल्या नाहीत.
२०१५ ला कुन्नूर (केरळ) येथील राष्ट्रीय स्पर्धेमधून महाराष्ट्राला कांस्यपदक मिळवून दिले. यावेळी रेल्वेकडून नोकरीही मिळाली; पण वयाच्या अडचणीमुळे मुकावे लागले.
२०१६ ला शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त झाला. हा पुरस्कार मिळविणाऱ्या कौशल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला कुस्तीगीर होत्या. नंतर त्यांनी पतियाळा (पंजाब) येथे एनआयएस प्रशिक्षण घेतले. २०१८ ला अकलूज येथील ताराराणी कुस्ती केंद्रात महिलांसाठी कुस्ती प्रशिक्षक म्हणून काम केले; पण ही नोकरी जेमतेम वर्षभर केली. कौशल्या यांना राष्ट्रीय पातळीवरील पाच सुवर्ण, चार रौप्य, चार कांस्यपदके मिळाली आहेत, तर आंतराष्ट्रीय स्तरावरील एक पदक पटकावले आहे. ‘दंगल गर्ल’ बबिता फोगट, रितू फोगट यांनाही चितपट केले आहे.
आपल्या भागातील मुलींनी या क्षेत्रात येण्यासाठी तालीम बांधण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. खासदार संजयकाका पाटील, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांनी तालीम बांधण्यास मदत केली; पण अतिवृष्टीमध्ये तालमीचे बांधकाम मोडून पडले. न खचता त्यांनी पुन्हा बांधकाम सुरू केले. वेळप्रसंगी सोनेही गहाण ठेवले; पण आजवर काम बंद पडू दिले नाही.
कौशल्या यांचे काही महिन्यांपूर्वीच आटके (ता. कऱ्हाड) येथील सागर पाटील यांच्याशी लग्न झाले. तेही याच क्षेत्रातील असल्याने तालीम उभी करण्यासाठी सहकार्य लाभत आहे.